पुणे : पथ दिव्यांच्या चालू-बंद करण्याच्या वेळा योग्य पद्धतीने नसल्याने महापालिकेचे महावितरणचे बिल वाढत असून हे वीजबिल बचत करण्यासाठी पालिकेचे पथदिवे संध्याकाळी 10 मिनिट उशीराने सुरू करण्याचे आदेश पालिकेच्या विद्युत विभागाने काढले आहेत. त्यामुळे, पावसाळ्यात आकाशात ढगांची गर्दी वाढल्याने शहरात अंधार लवकर पडत असताना विद्युत विभागास नागरिकांच्या सुविधेऐवजी वीजबचत करण्याचा प्रश्न सतावत असल्याचे चित्र आहे.
मात्र, त्याचवेळी शहरभर नगरसेवकांच्या आग्रहाखातर बसथांबे, वाचनालये, नागरिकांचे बसण्याचे कट्टे, रस्त्याच्या कडेला लावलेली संकल्पना शिल्प यावर नगरसेवकांच्या नावांच्या चमकोगीरीसाठी मोठ्य प्रमाणात विद्युत रोषणाईवर वीज खर्च होत असल्याने तो वाचविण्यास मात्र प्रशासनास वेळ नसल्याचे वास्तव आहे.
महापालिकेकडून शहरात वीज बचतीसाठी “उज्ज्वल’ या कंपनीस काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून पालिकेकडून पथदिव्यांवर वीज बचतीसाठी सुमारे 90 हजारे एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच महापालिकेने या दिव्यांच्या वेळाही कंपनीस निश्चित करून दिल्या आहेत. त्यानुसार, होणाऱ्या वीज खर्चाच्या बचतीमधील 98 टक्के रक्कम कंपनीस दिली जाते. कंपनीने मागील महिन्यात वेळेत बदल न केल्याने पालिकेच्या पथदिव्यांच्या बिलांचा खर्च वाढला असून पालिकेने निश्चित केलेले वीज बचतीचे उद्दिष्ट कंपनीकडून पूर्ण होत नाही. त्यामुळे, कंपनीने जून महिन्यात संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटाऐवजी 7 वाजून 30 मिनिटांनी पथ दिवे सुरू करावेत असे आदेश विद्युत विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे,
पुणेकरांची गैरसोय करून वीज बचत केली जाणार असल्याचे या आदेशावरून दिसून येत आहे.