मानसिक नैराश्याने ग्रासली असल्याचा दावा
लखनौ – राज्यातील संभळ नावाच्या एका गावात एका अल्पवयीन मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीले व त्यानंतर आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या मुलीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दहावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपले आयुष्य संपवले. वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार तसेच गुन्ह्यांचे वाढते प्रमाण याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांना या मुलीने तब्बल 18 पानी पत्र लिहीले आहे. या मुलीच्या आईने हे पत्र मोदी यांच्याकडे पाठविण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करतानाच याच गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची इच्छाही तिने या पत्रात व्यक्त केली होती. मात्र तशी भेट घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिने आत्महत्या केली.
दिवाळीतील फटाके, रासायनिक रंग यांवर पर्यावरणाच्या रक्षणासाठी बंदी घालावी अशी मागणीही या पत्रात केली आहे. या मुलीने स्वतःवर गोळी झाडण्यासाठी वापरलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली असून या बंदुकीच्या मालकीबाबत तपास केला जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.