बारामती -माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सत्ताधारी संचालक मंडळाने केलेली नोकर भरती व कामगारांची हुद्देवारी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत कारखान्याच्या परिसरात दोन सभासदांनी उपोषण सुरू केले आहे. सहा दिवस उपोषण सुरू असताना देखील प्रशासनातील कोणीही उपोषणस्थळी भेट देऊन साधी विचारपूसही केली नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कारखान्यात नुकताच सत्ताबदल झाला आहे. नवीन संचालक मंडळ सत्तेवर येताच मागील संचालकांनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा सत्ताधारी संचालकांनी लावला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना दिलेली हुद्देवारी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या रद्द करून नव्याने मर्जीतल्या कामगारांना हुद्देवारी दिल्याचा आरोप करत कारखान्याचे सभासद नानासाहेब आटोळे आणि गोविंद तावरे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कारखाना प्रशासनाने याबाबतची कोणतीही माहिती दिली नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
सहकारी साखर कारखानदारीबाबत इंदलकर समितीने ठरवून दिलेल्या आकृतिबंधाचे उल्लंघन करून कामगार भरती केल्याने सभासदांवर आर्थिक बोजा वाढणार आहे.
-गोविंद तावरे, उपोषणकर्ते