मुंबई : ऊसतोडणी मजुरांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना 28 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून यासाठी प्राथमिक स्वरूपात 1 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यास ग्रामविकास विभागाने विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.
ऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना राज्य शासनाने धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुराव्याने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून 28 दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात येत आहे. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशित केले होते.
त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, इतर सभापती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मागील चार दिवसांपासून याबाबत सखोल अभ्यास व प्रयत्न करून शासनाची विशेष बाब म्हणून धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परवानगी मिळवली. या निर्णयानुसार ऊसतोड मजुरांना तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्यात येणार आहे.