तीन एकर ऊस जळाला ः शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
भवानीनगर -काटेवाडी (ता. बारामती) येथील अनिल दिवाकर क्षीरसागर यांच्या शेतातील ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने क्षीरसागर यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
काटेवाडी येथील बारामती-इंदापूर रस्त्यालगत अनिल क्षीरसागर यांची शेती आहे. त्या शेतीमध्ये सध्या असलेल्या तीन एकरामध्ये उसाचे पीक होते. कारखान्याची उसतोड आलेली असताना शुक्रवारी (दि. 14) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिला आहे, त्यामुळे उसाला लागलेली आग मोठ्या प्रमाणात असल्याने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाडीला तातडीने बोलवण्यात आले; परंतु उसाने पेट घेतल्याने या अग्निशामकला ही आग आटोक्यात आली नाही. ही आग आटोक्यात येईपर्यंत क्षीरसागर यांच्या शेतातील तीन एकर ऊस व त्यात असलेल्या ड्रिपच्या पाइप या सर्व जळून खाक झाल्या. उसाला तोड आलेली असताना क्षीरसागर यांचे तीन एकरामध्ये ड्रिपसहित एकूण तीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत कन्हेरी व काटेवाडी येथील गाव कामगार तलाठ्याच्या वतीने जळालेल्या उसाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. याही अगोदर या भागामध्ये अशाप्रकारे काही शेतकऱ्यांचा ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवला असल्याने काही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
जरा पाइप तेवढा वाढवा…
श्री छत्रपती साखर कारखान्याची अग्निशामक गाडी जळत असलेल्या उसाच्या ठिकाणी पोहोचली; परंतु या अग्निशामकच्या गाडीचा पाण्याचा पाइप हा फक्त शंभर फूट असल्याने ही लागलेली आग विझवता आली नाही. याचा विचार करून तरी श्री छत्रपती कारखान्याने या अग्निशामक गाडीच्या पाण्याच्या पाइपची लांबी वाढवण्याची मागणी होत आहे.