बीड – साखर कारखान्यांनी कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे. कारखान्यांनी उसापासून साखरेसह इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. तसेच, कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केले.
बीड जिल्ह्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) या 60 किलो प्रति दिवस क्षमता असलेल्या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, येडेश्वरी साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, जवळपास 232 साखर कारखान्यांसाठी 9 ते 10 लाख मजूर ऊसतोडणी करतात. ऊसतोड मजुरांची पुढची पिढी चांगले जीवन जगू शकेल, यासाठी नुकतेच लोकनेते गोपिनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सुरू करण्यात आले आहे. या महामंडळासाठी साखर कारखाने व शासन यांच्याकडून जवळपास 200 कोटी रुपये रक्कम जमा होईल. हा निधी गरजवंतांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल. बीडसह 10 जिल्ह्यात ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी 41 ठिकाणी संत भगवानबाबा वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था होणार आहे.
तसेच 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत, शून्य टक्के दराने पीक कर्ज, अशी पावले उचलण्यात आली आहेत. शासनाने पायाभूत सुविधांसाठी जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरीक्त 19 टीएमसी पाणी
मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आगामी दीड ते दोन वर्षात छोटे मोठे प्रकल्प हाती घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. गोदावरी खोऱ्यातील अतिरीक्त 19 टीएमसी पाणी वापरास मंजुरी मिळाली आहे. गोदावरी खोऱ्यातील तूट अधिकाधिक भरून काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून, पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी नियोजित 7 टीएमसी पाण्यापैकी आगामी 2 वर्षांत 4 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.