Success Story : देशात एकीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी अहोरात्र प्रयत्न करतात आणि आपले इच्छित ध्येय साध्य करतात. मात्र कधी कधी सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही काहींना काही तरी वेगळे करण्याची इच्छा असते आणि तीच इच्छा त्या व्यक्तीला स्वस्त बसू देत नाही. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीर मधील या एका व्यक्तीसोबत घडला आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील मुश्ताक अहमद भट्ट. हे सरकारी नोकरदार..पण सरकारी नोकरी म्हणजे ९ ते ५ चा जॉब….रोज यायचं आणि तीच ती कामे करायची. असा त्यांचा दिनक्रम. पण या सरकारी नोकरीत मुश्ताक अहमद यांचे मन रमत नव्हते. पण जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी सरकारी नोकरी मुळातच मिळणे कठीण असते त्यात नवीन काही तरी करण्यासाठी या नोकरीला सोडावे लागणार होते. अशा चलबिचल अस्वस्थेत असताना अखेर त्यांनी या सरकारी नोकरीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. आणि एक दिवस मुश्ताक अहमद यांनी आपल्या सरकारी नोकरीला सोडून नव्याने काही तरी वेगळे करण्याचा विचार पक्का केला. त्यानुसार खूप विचारानंतर मुश्ताक अहमद यांनी जम्मूतील वातावरण आणि सगळ्यात लवकर उभा राहणार व्यवसाय सुरु केला तो म्हणजे नर्सरीचा.
मनात निर्धार पक्का करून नवीन व्यायसायाच्या दृष्टीने त्यांनी पहिले पाऊल टाकले आणि त्यात त्यांना चांगले यश मिळाले. सुरुवातीचा काळ थोडा कठीण गेला. मात्र हळूहळू मुश्ताक अहमद भट्ट यांना नर्सरी व्यवसायात खूप यश मिळत गेले. अहमद भट्ट आता 150 प्रकारच्या फळझाडांची लागवड करतात, त्यांच्या रोपवाटिकेत वर्षाला दोन लाखांहून अधिक रोपे उगवली जातात. अहमद भट्ट काश्मीरमध्ये फलोत्पादनाला केवळ प्रोत्साहनच देत नाहीत तर आजच्या घडीला लोकांना रोजगारही देत आहेत.
रोपवाटिकेत ५० जणांना रोजगार मिळाला
अहमद भट्ट गेल्या 35 वर्षांपासून नर्सरी व्यवसायात आहेत. अहमद भट्ट त्यांची रोपवाटिका ३०० कनालपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भट्ट यांनी सांगितले की, सध्या त्यांची रोपवाटिका 70 कनालमध्ये पसरलेली आहे. यासोबतच त्यांच्या नर्सरीत 50 लोक काम करत आहेत. पुढे बोलताना भट्ट यांनी सांगितले की, त्यांच्या रोपवाटिकेत दरवर्षी सुमारे 2 लाख रोपे उगवतात, ज्यात रूट स्टॉक, बडिंग-कलमी रोपे यांचा समावेश होतो.
रोपवाटिका 300 कॅनलपर्यंत वाढवण्याची योजना
ते पुढे म्हणाले की, आम्ही आणखी जमिनीचा वापर करून नर्सरी 300 कनालपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहोत. याशिवाय चांगल्या प्रकल्पांसाठी सरकारला सल्ला देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जेणेकरून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होऊ शकेल. ते म्हणाले, आम्ही चांगली उपजीविका करतो आणि या रोपवाटिकेत काम करणाऱ्या लोकांना आधार देतो. आमच्या इथे विविध प्रकारची झाडे आहेत. या रोपवाटिकेत डझनभर प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जाते.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुढे त्यांनी स्वतःविषयी आणि आपल्या व्यवसायाविषयी सांगताना, आपण सरकारी कर्मचारी म्हणून काम केले पण आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याने नर्सरी सुरू केले. झाडे-रोपट्यांचा पर्यावरणावर आणि समाजावर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांचे मत आहे. तसेच ते हा व्यायसाय करून सर्व तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या नर्सरीत काम करणाऱ्या अली मोहम्मदने सांगितले की, मी याठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसेच मुश्ताकसारखे लोक समाजात बदल घडवून आणू शकतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आयुष्यात सरकारी नोकरी मिळूनही समाधान मिळत नसेल तर आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी मोठे धाडस करावे लागते हेच दाखवून दिले आहे मुश्ताक अहमद यांनी. त्यांच्या या धाडसामुळेच आज जम्मू-काश्मीर सारख्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.