– संतोष वळसे पाटील
एसटीची सेवा विस्कळीत असतानाही महामंडळाचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष प्रवाशी आणि पासधारक विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि एसटीची कमी संख्या यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.
प्रवासी वाहतुकीची जबाबदारी राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगारावर आहे. तालुक्यातील एसटीचे आगार मंचर-तांबडेमळा येथे बांधून दोन वर्ष झाली, परंतु आगाराचे उद्घाटन झाले नाही. त्यामुळे एसटी आगार वापरात नसल्याने येथील प्रवाशांना नारायणगाव आणि राजगुरुनगर एसटी आगारातील एसटी गाड्यांवर अवलंबून रहावे लागते. गणपती उत्सव, दिवाळी, आळंदी आणि पंढरपूर यात्रा आल्यावर आठ ते पंधरा दिवसांच्या कालावधीपर्यंत नारायणगाव एसटी आगाराची मंचर-लाखणगाव, राजगुरुनगर एसटी आगाराची मंचर-भराडी, जवळे मार्गे शिंगवे, मंचर-कुरवंडी शटल मंचर-महाळुंगे पडवळ इत्यादी मुक्कामी एसटी गाड्या नेहमीच बंद असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
भीमाशंकर साखर कारखाना येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विद्यालय आणि अवसरी बुद्रुक येथील विद्याविकास मंदिर या विद्यालयात शिक्षणासाठी दीड हजार विद्यार्थी तालुक्याच्या विविध गावांतून ये-जा करीत असतात, परंतु एसटीची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना एक ते दोन तास एसटी गाडीची वाट पाहावी लागते. महाविद्यालय भरते आणि सुटतेवेळी वेळेवर एसटी गाड्या नसल्याचे शाळा व्यवस्थापकांनी सांगितले. तसेच नारायणगाव-पारगावपर्यंत येणारी एसटी फेरी कारखाना परिसरातील शिक्षण संकुलनापर्यंत यावी, अशी मागणी करूनही एसटी महामंडळ लक्ष द्यायला तयार नाही.
शिरुर कारखाना मार्गे मंचर, राजगुरुनगर, लोणी धामणी मार्गे कारखान्यापर्यंत सुरू करावी. मंचर-अवसरी आणि मंचर पिंपळगाव मार्गे कारखान्यापर्यंत एसटी फेऱ्या सुरू केल्यास येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच मंचर-घोडेगाव, मंचर-कुरवंडी, मंचर-महाळुंगे पडवळ, मंचर-रांजणी इत्यादी एसटी गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.