मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांना युट्यूबर हिंदुस्थानी भाऊने रस्त्यावर येण्यास आवाहन केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन केल्याचे हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकने मीडियाशी बोलताना सांगितले.
विकास फाटक म्हणाला की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतो. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं.”
दरम्यान, आज राज्यातील अनेक ठिकाणी दहावी बारावीचे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्या यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागला. या आंदोलनाचे व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तसेच परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत या निर्णयाबाबत वेट अन्ड वॉचची भूमिका असून दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलायचा की नाही? ते त्या वेळच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवलं जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा प्रस्ताव शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समोर ठेवला आहे. त्यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा परीक्षा संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बोर्डाचा अभ्यासक्रम ऑनलाईन ऑफलाईन शिकवत शाळेने जरी पूर्ण केला असला तरी स्वतःला तयारीसाठी आणखी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली तर अभ्यासाची तयारी पूर्ण होईल, असं काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर परीक्षा वेळापत्रकनुसार झाली तर पुढे परीक्षांचा निकाल, अकरावी प्रवेशप्रक्रिया वेळेत होतील. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचे संभ्रमाचे वातावरण राहणार नाही असं सुद्धा काही पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.