श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आपण संघर्ष बाजूला ठेवून पाचपुते यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन नागवडे साखर कारन्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे केले.
आढळगाव येथे आयोजित भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष देवराव शिंदे होते. नागवडे म्हणाले, राजकारणातील संघर्ष बाजूला ठेवून लोकांच्या हितासाठी व कुकडी, साकळाई योजनांच्या कामासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कायम संघर्ष करून काही साध्य होत नाही, म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने पाचपुते यांना साथ द्यायची आहे, असे नागवडे म्हणाले.
यावेळी प्रा. तुकाराम दरेकर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्यावर टीका करताना म्हणाले, शेलार हे नेहमी आर्थिक तडजोडी करणारे आहेत. ज्यांनी 1997 मध्ये शरद पवार यांना विरोध केला होता. तेच आता त्यांचे उमेदवार आहेत. पण जनता गाफील न राहता पाचपुते यांना पाणी प्रश्नावर मदत करणार आहे. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य रमेश गिरमकर, दत्ताभाऊ कोठारे, सुनील भोस आदी उपस्थित होते.