नगरसेवकांची तीन दिवसांतच घर वापसी…
कॉंग्रेस आघाडीच्या सात नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तीन दिवसातच यातील दोन नगरसेवक राजू लोखंडे व निसार बेपारी आज पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आले. तीन दिवसातच पक्षांतराच्या दोन उड्या घेतल्याने शहरात हा चर्चेला विषय बनला आहे.
श्रीगोंदा – मंत्री असताना मला काहीच अधिकार नव्हते, असे बबनराव पाचपुते सांगतात. गृहराज्यमंत्री, वन व आदिवासीमंत्री यांसारखे महत्वाचे पदे त्यांना दिले. 13 वर्षे मंत्री असून जर काहीच करता येत नसेल तर त्यांनी हातात बांगड्या भरल्या पाहिजे, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
श्रीगोंद्यातील जाहीर सभेत पवार यांनी पाचपुते यांनाच टीकेचे लक्ष्य केले. पवार म्हणाले, पाचपुते यांनी आणखी चार कारखाने काढावेत, मात्र शेतकऱ्यांचे व कामगारांचे पैसे द्यावे. गरिबांचा तळतळाट लागला की आयुष्यात यश येत नाही.शेतकऱ्यांनी आता पैशासाठी आंदोलन न करता पाचपुतेंच्या हवेलीत जाऊन बसावे. आम्ही त्यांना फोन केल्याचे ते सर्वत्र सांगतात.तुम्हाला एवढं देऊनही तुम्ही एका जाग्यावर राहत नाही म्हटल्यावर तुम्हाला कशाला कोण फोन करेल.. शरद पवार यांनी आज पाचपुतेंच लक्ष्य केले असल्याने ऐरवी शेतकरी, राज्य व केंद्र सरकारवर होणार टिका त्यांनी टाळली.
यावेळी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, माजी खासदार दादा पाटील शेळके आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर अंकुश काकडे, सचिन जगताप, दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, अनिल वीर, युवक अध्यक्ष ऍड. ऋषिकेश गायकवाड, दादा औटी, संजय आनंदकर, नगरसेवक समीर बोरा, गणेश भोस, स्मितल वाबळे, विकास बोरुडे आदी उपस्थित होते.