महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आम्हा सर्वांनाच सुखावणारा असतो. अफाट लोकसंग्रह असणारा नेता म्हणून अजित पवार यांची महाराष्ट्रात ओळख आहे. भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून दादांच्या कारकीर्दीस सुरूवात झाली. त्यानंतर आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख, नेतृत्व, व्यक्तिमत्व निर्माण केले आहे.
मागील पाच वर्षांत सत्ता नसतानाही त्यांचा लोकसंग्रह तसूभरही कमी झालेला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दादा कोठेही गेले तरी लोकांची गर्दी त्यांच्यापासून हटत नाही. ही जनसंपर्काची पोचपावती आहे. यापुढेही त्यांचा लोकसंग्रह कधीही कमी होणार नाही. दादांसारखा दुर्मिळ नेता महाराष्ट्राला लाभला आहे. बारामतीत जन्माला आले, याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो.
दादांचा रोखठोक व परखड स्वभाव सर्वांनाच ज्ञात आहे. विधीमंडळात दादा एखाद्या विषयावर बोलताना अभ्यासपूर्ण बोलत असतात. याची प्रचिती आपणास नेहमीच येते. त्यांच्या प्रभावी वक्त्तृत्वाने विरोधकांनाही घाम फुटतो. ज्या ज्या खात्यांचा कारभार दादांनी पाहिला. त्या- त्या खात्याला त्यांनी न्यायच दिला आहे. एखादे काम आपणाकडून होणार असेल, तरच ते होकार देतात. कार्यकर्त्यांना उगीचच पाठीमागे फिरवायचे, तोंडावर फक्त काम करतो, असे म्हणायचे अशा गोष्टींची दादांना फार चीड आहे.
म्हणूनच दादांचा हा स्पष्ट स्वभाव सर्वांनाच भावतो. कार्यतप्तरता, कार्यकौशल्य, हजरजबाबीपणा या गुणांमुळे दादांनी प्रशासनावर मजबूत पकड ठेवली आहे. दादा कामात कितीही व्यस्त असले तरी कार्यकर्त्यांना अगदी सकाळी सहा वाजताही भेटण्याची त्यांची तयारी असते. वेळेत पोहोचणारा नेता म्हणून दादांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. दिलेल्या वेळेत नव्हे उलटपक्षी वेळेपूर्वीच कार्यक्रमाला हजर असतात. दादांचा हा गुण प्रत्येक कार्यकर्त्याने घेतला पाहिजे. शिस्तबद्ध दादा नेहमीच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आदर्शवतच आहेत. त्यांचा कामाचा धडाका प्रचंड आहे. सर्वसामान्यांविषयी त्यांचा कळवळा ओतप्रोत भरला आहे. त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांना सहकारातील निरीक्षण, दूरदृष्टीतून बळ दिले आहे. याची प्रचिती जिल्हा- जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकास्तरीय नेत्यांना आली आहे.
ग्रामीण भाग सक्षम व्हावा, ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा, यासाठी दादांची व खासदार सुप्रियाताई सुळे यांची नेहमीच धडपड असते. “स्वच्छ बारामती, सुंदर बारामती’ हिरवळमय बारामती करण्यात दादांचे योगदान मोठे आहे. रस्त्याने जाताना एखादे झाड वाळलेले दिसले तरी अधिकाऱ्याला फोन करतात. एवढे बारीक त्यांचे लक्ष असते. दादांना स्वच्छतेची फार आवड आहे. एखाद्या ठिकाणी अस्वच्छता दिसल्यास तात्काळ ते बोलतात, हा अनुभव अनेकांना आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दादा पोटतिडकीने बोलत असतात. विद्या प्रतिष्ठान असो पुणे जिल्हा शिक्षण मंडळ किंवा रयत शिक्षण संस्था आदी कोणत्याही कार्यक्रमात ते नेहमी सांगतात की, गुणवत्तेत तडजोड करू नका. ग्रामीण शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड वाखाणण्यासारखी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याने प्रगती केली पाहिजे, ही त्यांची नेहमी तळमळ असते.
उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेताच त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. करोनाच्या काळात माझी महाराष्ट्रातील जनता सावरली पाहिजे, यासाठी ते नेहमी दक्ष राहत आहेत. बारामतीतील प्रशस्त रस्ते असो की प्रशासकीय इमारती हे दादामुळेच शक्य झाले आहे. अगदी संपूर्ण देशात कोणत्याही तालुक्याचा विकास झाला नसेल एवढा विकास बारामती तालुक्याचा झाला आहे. हा विकास दादांमुळेच झाला आहे. सुनेत्रावहिनी यादेखील दादांच्या खांद्याला खांदा लावून “एन्व्हायरमेंटल फोरमच्या’ माध्यमातून काम करीत आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य केले आहे.
आदरणीय दादांसारख्या कर्तबगार नेत्याने महाराष्ट्राचे सदैव नेतृत्व करावे, तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभावे, ही सातव परिवार व तमाम बारामतीकरांच्या वतीने प्रार्थना करतो.
सचिन सातव गटनेते, बारामती नगर परिषद.