महाराष्ट्राचे समाजभान नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आपण कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ समाजकारण करताना आलो. त्यानंतर खऱ्या अर्थाने मला विकासकामांबाबत पाठपुरावा करण्यासाठी एक ऊर्जा मिळाली. दादांची विकासाप्रती निष्ठा आणि सर्वसामान्यांबाबत असलेला कळवळा हेच दादांचे प्रेरणास्त्रोत आहे.
माझे वडील पोलीस विभागात अधिकारी होते. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संपर्क येत होता. विकासकामे करताना प्रशासन आणि नागरिक हे दुवा आहेत, हे ओळखले. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर तळागाळातील प्रश्न, सामाजिक कार्य करण्यासाठी झोकून देऊन काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अजितदादा यांच्याशी संपर्क आला. त्यावेळी दादांनी माझी विकासकामाची असलेली तळमळ पाहून नस ओळखली.
त्यावेळी कोणतेही काम असले तर माझ्याशी संपर्क कर, असे सांगून मला काम करण्याची ऊर्जा दिली. त्यातून काम करीत राहिलो. दादांशी संपर्क आल्यानंतर त्यांची लोकांप्रती असलेली धडपड, कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा, प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना हे चुटकीसरशी सोडवितात. या कामातून दादांनी जनतेच्या मनात आपुलकी आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे.
बारामती नगर परिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर सायली हिलचा परिसर नगरपरिषदेत समाविष्ट झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने परिसराचा पर्यावरणपूरक कायापालट करण्यासाठी ध्यास घेतला. 2015 पासून स्वच्छ बारामती, सुंदर बारामती अंतर्गत योगदान देत आहे. सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम सुरू आहे. 2016 ते 2020 या कालावधीत श्रमदानातून 51 स्वच्छता शिबिरे यशस्वीपणे राबविली आहेत. आजही ही शिबिरे अव्याहतपणे सुरू आहेत.
अजितदादांची राज्यभर दौऱ्यांची व्याप्ती मोठी असल्यामुळे बारामती शहरातील समस्या सोडविण्यासाठी टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी या प्रयत्न करतात. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. पर्यावरण क्षेत्रात काम करताना सुनेत्रा वहिनींची लाखमोलाची मदत झाली. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सायली हिल परिसरात 501 वृक्षांचे रोपण केले आहे. वृक्षलागवडीपुरते न थांबता पक्षी, प्राणी, पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी 51 ठिकाणी माहिती फलक बसविले आहेत. गणेशोत्सव, दीपावली आदी उत्सवात सर्वसामान्यांचा सहभाग माझ्यासाठी स्फूर्ती देणारा आहे. करोनाच्या संकटात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्यासाठी अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.
दादा शहरात आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. कोण समस्यांचे निराकारण करण्यासाठी येतो. आपल्या प्रलंबित कामांना फक्त दादा हेच न्याय देणार, हा ठाम विश्वास प्रत्येकांना उभारी देणारा असतो. त्यामुळे प्रत्येकांना दादांना भेटण्याची आस असते. त्यातून कार्यकर्ते समाधानी आणि तृप्त होऊन जातात. बारामती शहरात आल्यानंतर त्यांचे मतदारसंघावर बारकाईने लक्ष असते. कोणते काम प्रलंबित राहिले आहे काय, तसेच अधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना, नवीन कामांचा प्रस्ताव आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची हातोटी सर्वसामान्यांना सुखावणारी ठरत आहे.
सायली हिल परिसरातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी दादांचे नेहमीच मार्गदर्शन माझ्यासाठी प्रेरणा बनून राहिली आहे. परिसरातील सर्वसामान्यांना सुविधा देण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. रस्ते, ड्रेनेज पाइपलाइन आदी सुविधा मार्गी लावल्या आहेत. केवळ दादांच्या खंबीर पाठबळावर विकासकामे मार्गी लावण्यात यश आले आहे.
शब्दांकन : प्रमोद ठोंबरे (बारामती)
मंगेश ओमासे, सायली हिल, बारामती.