नगर – शहरात अवैध व्यवसाय आणि बेकायदेशीर अतिक्रमणांमुळेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हे अतिक्रमण तसेच अवैध व्यवसाय पूर्ण बंद करण्याच्या कडक सूचना पोलीस आणि महापालिका प्रशासनास दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शहरात कापड व्यापाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर जखमी दीपक नलवानी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पोलीस प्रशासन आणि महापालिकेला अतिक्रमण काढण्याच्या कडक सूचना दिल्या असून यावर कारवाई सुरू देखील झाली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून चौकशीत जे सत्य समोर येईल, त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सर्व स्तरातील लोकांची एक बैठक घेण्यात येऊन या बैठकीत ज्या काही सूचना येतील. त्यावरून मार्गदर्शक तत्व तयार करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विविध मिरवणुकांनाचे मार्ग देखील लवकरच ठरविण्यात येणार असून कुठल्याही जयंती, उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.