– अमित डोंगरे
विक्रमादित्य सुनील गावसकर हे नाव असे आहे की, आजही निवृत्तीनंतर इतकी वर्षे होऊनही जागतिक क्रिकेटमध्ये आदराने घेतले जाते. इतकेच नव्हे तर त्यांचा क्रिकेटबद्दलचा शब्द आजही प्रमाण मानला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून ते जी काही वक्तव्ये करत आहेत ते पाहिले की असे वाटते सनीभाई केवळ काठावर बसून राहण्यापेक्षा पाण्यातही उचरा. केवळ सल्ले का देता बरे सल्ले देणे चूक नाही, पण माध्यमांशी बोलताना का देता, ज्या खेळाडूचे काही कुठे चुकत असेल तर थेट त्या खेळाडूशीच संवाद का साधत नाही.
मागे विराट कोहली अपयशी ठरत असताना त्याने जर मला संपर्क केला तर तो कुठे चुकत आहे हे मी त्याला सांगेन एका क्षणात त्याची चूक दुरुस्त होईल, पण हे त्यांनी थेट कोहलीलाच का सांगितले नाही. आताही आयपीएल स्पर्धा सुरू असताना रोहित शर्मा, इशान किशन, शुभमन गिलपासून यच्चयावत अपयशी ठरत असलेल्या खेळाडूंचे त्यांनी माध्यमांशी बोलताना कान टोचले आहेत.
मात्र, ते माध्यमांसमोरच. आहो तुमचा हक्क इतका मोठा आहे की तुम्ही थेट सराव सत्रात जाऊन त्या खेळाडूला आपल्याकडे बोलावून त्याचे काय व कुठे चुकत आहे व त्यासाठी काय उपाय केला पाहिजे हे थेट सांगू शकता. आजतरही संपूर्ण जगात असा एकही क्रिकेटपटू नाही जो गावसकरांचा सल्ला धुडकावून लावेल. मग हे दुरून डोंगर साजरे कशासाठी.
बॅकस्ट्रोक असा असतो, पाण्यात उतरून पोहायला शिकताना हात व पाय असे व्हल्ह्यासारखे हलवायचे असतात हे सल्ले देणे सोपे असते प्रत्यक्ष पाण्यात उतरल्यावरच ते कळते. तसेच समालोचक म्हणून माध्यमांशी बोलणे सोपे आहे प्रत्यक्ष त्या खेळाडूची भेट घेत गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असे म्हणायला हरकत काय आहे. प्रत्येक मुलाखतीतून आपला फायदा पाहण्यापेक्षा कधीतरी ज्या खेळाची तुम्ही मक्तेदारी आपल्या हाती ठेवली होती, त्यातील नवोदितांनाही आपल्या अनुभवाचे प्रत्यक्ष धडे द्या.