नगर – नगर जिल्ह्यात मागील दोन दिवस सलग वादळी वाऱ्यासह गारपिटीने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी झालेल्या पावसाने नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, संगमनेर, अकोले तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे 1 हजार 785 हेक्टरवर पिकांना फटका बसला. काढणीला आलेल्या रब्बी पिके, फळबागा व चारा पिकांचे नुकसान झाले आहे. यात 2 हजार 811 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून संगमनेरमधील दहा घरांची पडझड झाली तर अकोलेमध्ये चार शेळ्याचा मृत्यू झाला आहे. नगर तालुक्यात एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिट झाल्याने गहू, हरभरा, कांदा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील वेळेस झालेल्या अवकाळीच्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नसताना त्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना कोंडीत पकडले. आधीच शेतमालाला मातीमोल भाव मिळत असताना हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असल्याने शेतकरी अधिकच हतबल झाले आहेत. शनिवारी नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, संगमनेर, अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटी व अवकाळी पाऊस झाला.
या पावसाने, गहू, कांदा, संत्रा, मोसंबी, इतर फळपिके व चारा पिकांचे नुकसान झाले. शनिवारी झालेल्या अवकाळीमध्ये सर्वाधिक नुकसान अकोले तालुक्यात झाले आहे. 1 हजार 102 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा 1 हजार 452 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या खालोखाल श्रीगोंदा तालुक्यात 322 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून 568 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात 258 हेक्टर तर 632 शेतकरी, जामखेडमध्ये 16.90 हेक्टर क्षेत्र असून 39 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. संगमनेरमध्ये 60 हेक्टर क्षेत्र असून 140 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे.