अरुण गोखले
आपली भारतीय संस्कृती ही कथा सरितेच्या माध्यमातून अखंडपणे वाहत आहे. कथा हे एक प्रभावी माध्यम असून त्याद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य हे अविरतपणे चालू आहे, तसेच ते पुढेही अखंडपणे असेच चालत राहणार आहे.
कथा निवेदन आणि कथा श्रवण हा भक्तिसाधनेतला एक महत्त्वाचा भाग आहे, असे जरी म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. नारदीय भक्तिसुक्तात श्रवण भक्ती हा भक्तिमार्गातला एक सुंदर मार्ग, असे सांगून ठेवलेले आहे. कीर्तन प्रवचन, पोथ्या पुराणे ह्यातील कथा माध्यमांचा लोकजागृती, समाज प्रबोधन, सन्मार्गाची शिकवण, शुद्धाचरणाचा बोध ह्यासाठी प्रभावीपणे वापर केला गेल्याचे अनेक ग्रांथिक दाखले आपल्याकडे उपलब्ध आहेत.
एखाद्या व्रतासंदर्भात त्या व्रताचे महत्त्व, त्याचा महिमा सांगण्यासाठी जी कथा त्या व्रताशी जोडलेली असते तिलाच व्रतकथा किंवा व्रत कहाणी असे म्हटले जाते. आपल्या धार्मिक संस्कृतीत मानवी मनातील श्रद्धा, भक्ती आणि ईश्वर निष्ठेस या कहाण्यांनीच खतपाणी घालून पिढ्यान्पिढ्या समृद्ध केलेले आहे. हा ज्ञानाचा, बोधाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असाच चालत आलेला आहे.
या कथांना मानवी जीवनात फार मोठे मोल आहे. जी गोष्ट आपण दुसऱ्याच्या मनावर अन्य कोणत्याच माध्यामाने प्रभावीपणे पोहोचवू शकत नाही, तीच गोष्ट प्रभावी कथा माध्यमाने साध्य करता येते.
या व्रतांच्या छोटेखानी कहाण्या लेखनाचीही एक विशिष्ट पद्धत आहे. त्या एका विशिष्ट अशा पद्धतीनेच सुरू होतात आणि त्यांचा शेवट हासुद्धा ठरवून निश्चित केलेला असतो. उदा. या व्रतकथांची सुरुवात ही, एका देवा तुमची कहाणी! आटपाट नगर होत. तिथं एक राजा राज्य करीत होता, अशी असते किंवा त्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहात होता, अशी तरी असते. तसेच या कथांचा शेवट हासुद्धा एका खास अशा पद्धतीनेच केलेला असतो. जसे की, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.
या कथांची लेखन पद्धतीही आगळी अन् वेगळी अशीच असून त्यांना एक गोडवा असतो. नाद असतो, एक माधुर्य असते. कथांची वाक्यरचना ही साधी सोपी आणि सुटसुटीत व लहान लहान असते. ती वाचायला समजायला सोपी असते. कथेला एक ओघ आणि शब्दांचे नाद माधुर्य असते. या कथा मोठ्या श्रवणीय आणि त्यातील बोध हा आचरणीय असतो.