पळसदेव – इंदापूर तालुक्यात अनियमित भारनियमन करण्यावर महावितरणने सपाटा लावला आहे. नागरिकांना कोणतीही कल्पना न देता 8 ते 10 तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. पळसदेव भागात देखील याची प्रचिती नागरिकांना येत आहे. सध्या यात्रा कालावधी सुरू आहे. या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक महावितरण अधिकारी म्हणतात की, भारनियमनाबाबत थेट वरिष्ठ कार्यालयातून फोन येतो व वीजपुरवठा खंडित करावा लागतो. दरम्यान, महावितरणच्या वतीने करण्यात येत असलेल्या वाढत्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच उन्हाळा अधिकच तीव्र झाला आहे. त्यात वीज नसल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटाका बसत आहे. तर उष्णता वाढल्याने पिकाला सतत पाणी द्यावे लागत आहे; मात्र वीज नसल्याने पिकाला पाणी देण्यासाठी मोठी अडचण होत आहे. शेतातील उभी पिके जाळून जात आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
याबाबत तातडीने महावितरणने उपाययोजना करावी, अशी मागणी पळसदेवचे माजी उपसरपंच प्रवीण काळे यांनी केली आहे. महावितरणच्या वतीने किमान नागरिकांना पूर्व कल्पना देऊन भारनियमन करावे. अचानक भारनियम करणे तातडीने थांबवण्यात यावे, अन्यथा महावितरणच्या मनमानी कारभार बाबत बारामती कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे प्रवीण काळे यांनी सांगितले.
सध्या भारनियमन हे वसुलीनुसार केले आहेत. वसुलीनुसार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, जी 1, जी 2, जी 3 यानुसार ग्रुप बनवले आहेत. त्यानुसार भारनियमनाचे नियोजन केले आहे. सध्या आचानक विजेची मागणी वाढली आहे. त्याप्रमाणत वीज उपलब्ध होत नसल्याने राज्यात आणखी काही दिवस विजेचा तुटवडा असणार आहे.
– गणेश लटपटे, कार्यकारी अभियंता, बारामती विभाग