राजगुरूनगर -पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगर येथे सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक, प्रवासी हैराण झाले आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सलग सुट्या आल्याने गेली दोन-तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
राजगुरूनगर शहरातील एसटी बस स्थानकाजवळील अरुंद पूल भीमा नदीवरील अरुंद पूल या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. महामार्गावरून शहरातून जाणारा आणि पाबळकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने वळताना महामार्गावरील दोन्ही बाजू ठप्प होत असल्याने वाहतूक कोंडीला सुरुवात होते. खेड पोलीस ठाण्याचे अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस बळ वाहतूक कोंडी काढण्यासाठी रस्त्यावर असल्याने इतर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विलंब होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरात दिवसागणिक वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तासंतास नागरिकांना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी (दि. 15) लग्न तिथी, सलग सुट्या, गावोगावच्या यात्रा असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच वाहनांची टोल नाक्यापासून थिगळस्थळ पर्यंत वाहनांची गर्दी झाली होती. राजगुरूनगर शहरातील पाबळ चौकलगत महामार्गावर एक एसटी बस बंद पडल्याने वाहतुककोंडीत अजुनच भर पडली.
अनेक वाहनचालक जागा मिळेल तिथे वाहन दामटीत होते. जड वाहने, कंटेनेर महामार्गावर जात असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भर उन्हात पोलिसांची चांगलीच कसरत होत होती. त्यात अवजड वाहनास बाजु घेण्याच्या प्रयत्नात काही लहान चारचाकी वाहने रस्त्यात खोळंबली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन दिवसभर वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
बाह्यवळणास आणखी सहा महिने?
राजगुरूनगर शहर बाह्यवळण रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. भीमा नदीवरील पूल पूर्ण झाला आहे तर रस्त्याचे इतर कामही युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीपर्यंत या बाह्यवळणावरून वाहने धावतील. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा ठेकेदाराचे प्रयत्न आहेत; मात्र ते पूर्ण होईल असे एकंदरीत वाटत नाही.