मुंबई – अमेरिकेच्या व्याज दरवाढीमुळे भारतातून परदेशी गुंतवणूक आगोदरच परत जात असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकावर परिणाम होत असताना रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे भारतीय गुंतवणुकीवर आणखी परिणाम होणार आहे.
गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल 3,417 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.
तीन महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. युद्ध सुरू झाल्यामुळे डॉलर कमालीचा बळकट होऊन रुपयाचे मूल्य कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतात केलेली गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना जास्त परवडत नाही.
त्याऐवजी डॉलर संबंधित गुंतवणूकितून त्यांना अधिक परतावा मिळतो. त्यामुळे हे गुंतवणूकदार रुपया घसरत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेतून गुंतवणूक काढून घेत आहेत. भारत आयात करीत असलेल्या क्रुडच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर भारताचा आयातीचा खर्च वाढून त्याचा रुपयाच्या मूल्यावर आणखी परिणाम होणार आहे असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.