मुंबई – रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांकही दिवसभरात पावणे पाच टक्क्यांनी कोसळले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून याच कारणामुळे शेअर बाजार निर्देशांकांत घट होत आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2,702 अंकांनी म्हणजे 4.72 टक्क्यांनी कोसळून 54,529 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 815 अंकांनी कोसळून 16,247 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स संदर्भातील सर्व 30 कंपन्यांचे निर्देशांक कमी झाले. इंडसइंड बॅंक, महिंद्रा, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर 8 टक्क्यापर्यंत कोसळले. युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले असून कच्च्या तेलाचे दर पाच डॉलरने वाढले आहेत. युरोपातील शेअर बाजार निर्देशशंक 4 टक्क्यांनी कोसळले.
13.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी पावणे पाच टक्क्यांनी कोसळल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे एकाच दिवसांमध्ये 13.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 242 लाख कोटी रुपयांवर आले आहे. सध्या फक्त रशिया आणि युक्रेन दरम्यान तणाव वाढलेला आहे.
मात्र जर यामध्ये नाटोने प्रवेश केला तर जागतिक शेअर बाजाराचे आणि भारतीय शेअर बाजाराचे यापेक्षा जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सकाळपासूनच शेअर बाजारांमध्ये कमालीची भीती पसरली होती. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार आहे याबाबत गुंतवणूकदारास मध्ये चर्चा चालू होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेअर बाजार निर्देशांकाचा तळ काय आहे हे सांगणे अवघड आहे असे महिंद्रा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा यांनी सांगितले