मुंबई – युक्रेन -रशिया युद्धामुळे जागतिक वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यातल्या त्यात युक्रेन नजीकच्या काळ्या समुद्रातून होणाऱ्या जागतिक वाहतुकीवर जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे भारताच्या आयात आणि निर्यातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो असे निर्यातदारांच्या संघटनेने म्हटले आहे.
युक्रेन आणि रशियातून काळया समुद्राच्या मार्गे जगाला मोठ्या प्रमाणात गहू पुरवठा केला जातो. त्यामुळे जागतिक अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा असल्यामुळे भारताला या आघाडीवर फार त्रास होणार नाही.
मात्र भारतीय उद्योगांना बऱ्याच वस्तूची आयात करावी लागते या आयातीवर परिणाम होऊ शकतो. या सुट्या वस्तूं न मिळाल्यानंतर भारतातील उद्योगाच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो असे या संघटनेचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले. च्याच्या वस्तू काळ्या समुद्रमार्गे जातात त्यांना प्रवास न करण्यास सांगण्यात आले आहे. जर युध्द लांबले भारताच्या निर्यातीवर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो.
करोनातून जग सावरले आहे आणि आता जागतिक व्यापार व्यवस्थित सुरू झाला असताना अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे जागतिक परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची युरोपातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आयात आणि निर्यात होते. मात्र युरोपातील सर्व देश अप्रत्यक्षरित्या या युद्धात सामील झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. युरोपातील बहुतांश देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर त्या देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये युरोपला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे समाधानाचे वातावरण पसरले असताना हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भारत आणि रशियादरम्यान या आर्थिक वर्षात 9.4 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. गेल्या वर्षी या काळात 8.1 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. आगामी काळामध्ये या व्यापारावर परिणाम होणार आहे. भारत आणि युक्रेन दरम्यानचा व्यापार 5 अब्ज डॉलरचा आहे. या व्यापारावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. आज शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कोसळले. आयात आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले.