IND vs AFG, Football – भारतीय फुटबॉल संघाला अफगाणिस्तानने गुवाहाटीला झालेल्या सामन्यात २-१ अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताच्या फिफा विश्वकरंडक २०२६ आणि आशिया कप २०२७ साठीच्या पात्रता फेरीच्या तिसऱ्या टपप्यात पोहचण्याच्या आशा संपूष्टात आल्या आहेत. त्यामुळेच भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांना काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.
हा सामना भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचा १५० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने या सामन्यात 38३८ व्या मिनिटालाच पेनल्टीवर अप्रतिम गोलही करत भारताला आघाडी मिळवून दिली होती.
भारताने दुसऱ्या हाफमध्येही ही आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ७० व्या मिनिटाला रेहमत अकबारीने अफगाणिस्तानला बरोबरी साधून दिली, तर शरिफ मुखम्मदने ८८ व्या मिनिटाला दुसरा गोल करत अफगाणिस्तानला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे या सामन्यात ११७ व्या स्थानी असलेल्या भारताला १५८ व्या क्रमांकावरील अफगाणिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला. या पराभवामुळे भारताला ३ महत्त्वाचे गुणही मिळवता आले नाही. आता भारत दुसऱ्या फेरीत अ गटात भारताकडे चारच गुण आहेत, तर अफगाणिस्तानकडेही ४ गुणच आहेत.
कतार ९ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर कुवेत ३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता भारताला तिसऱ्या फेरीत पोहचण्यासाठी आगामी उर्वरित दोन सामन्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्यावर्षी भारतीय फुटबॉल संघाने क्रमवारीत १०० च्या आतील स्थान मिळवले होते. परंतु, त्यानंतर सातत्याने संघाची कामगिरी खालावली. आशिया कप स्पर्धेतही भारताला सलग तीन सामन्यातील पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. याशिवाय भारताने फिफा विश्वकरंडक आणि आशिया कपसाठीच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात कतारविरुद्ध पराभव स्विकारला. भारताने या फेरीत केवळ कुवेत विरुद्ध विजय मिळवला आहे.
स्टिमॅकना हटवण्याची चाहत्यांची मागणी
भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला केवळ प्रशिक्षक स्टिमॅकच जबाबदार आहेत, असे चाहत्यांनी म्हटले आहे. तसेच स्टिमॅक यांना प्रशिक्षक पदावरून दूर करावे यासाठी मागणी करत आहेत. सध्या सोशल मिडीयावर स्टिमॅक यांच्याविरोधात मोठा सुर निघत आहे. भारताच्या अपयशासाठी अनेकदा स्टिमॅक यांनी पायाभूत सुविधा, क्लब आणि खेळाडूंना दोषी ठरवले होते. मात्र आता भारतीय संघाच्या मोठ्या अपयशानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच त्यांनी संघाच्या निवडीसाठी घेतलेल्या ज्योतिषी सल्ल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.