पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला आणि उबर या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुन्हा बैठक पार पडली. आठवडाभरात दुसरी बैठक घेऊनही कुठलाच तोडगा निघाला नसला, तरी याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंगळवारी (दि. १२ ) सायंकाळपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
वातानुकूलित टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. यानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला होता. या प्रस्तावाला तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे हे नवीन दर जानेवारी महिन्यात लागू झाले असूनही, ओला आणि उबर कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असताना कंपन्यांनी नोटीसला प्रतिसाद दिलेला नाही.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, ओला, उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ओला, कॅबचालक, संघटनांचे प्रतिनिधी यांची आठवडाभरात दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत कॅबचालकांनी जिल्हा प्रशासनाकडून तत्कालीन जिल्हाधिकारी देशमुख यांनी २५ रुपये दराचा निर्णय घेतला होता, त्यामध्ये सुवर्णमध्य काढून तातडीने दर निश्चित करण्याबाबत आग्रह धरला. मात्र, कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या जुन्या वाहतूक धोरणातील निर्देशांवर बोट ठेवले.
त्यामुळे कॅबचालक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाबाबत ठाम असल्याची भूमिका घेण्यात आली. ओला, उबर कंपन्यांसाठी असणाऱ्या वाहनचालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकी झाली. त्यांच्या मागण्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार कायद्यात बसविण्यासाठी तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंगळवारी निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.