स्टीपलचेसपटू अविनाश साबळेने व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली – करोनाच्या संकटामुळे क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या असल्या तरीही आगामी काळात सर्व अडथळ्यांवर मात करत यश मिळवेनच, असा विश्वास भारताचा अव्वल धावपटू अविनाश साबळे याने व्यक्त केला आहे.
देशाकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते ते पूर्ण झाले. मैदानी स्पर्धेत देशाच्या अनेक खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्यांच्याचकडून प्रेरणा घेत मी मैदानी स्पर्धेत खेळण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी देशाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असे वाटले नव्हते. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेल्या तीन मोसमांत सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे आता टोकियो ऑलिम्पिकमध्येही राष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे सरस कामगिरी करून देशाला पदक जिंकून देणे हेच मुख्य लक्ष्य आहे, असे साबळे याने सांगितले.
ऑलिम्पिकला पात्र ठरलेला साबळे भारताचा सर्वात अव्वल मैदानी खेळाडू असून 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत रजतपदक मिळविल्यानंतर खरेतर तो प्रकाशझोतात आला. त्यानंतरही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 8 मिनिटे व 21.37 सेकंद अशी वेळ देत त्याने 3 हजार मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. ही कामगिरी आजही कोणी मागे टाकलेली नाही.
चुका सुधारण्यावर भर….
करोनाच्या संकटाने तीन महिने सराव करता आला नाही. करोनामुळेच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे गेली. या मिळालेला सक्तीचा वेळ तंदुरुस्तीसाठी तसेच व्यायामासाठी सत्कारणी लावता आला. आता पाचव्या लॉकडाऊनमध्ये सरकारने सवलती दिल्याने सराव केंद्रे सुरू झाली असून वैयक्तिक सरावही सुरू केला आहे. त्यात चुका कशा कमी होतील याकडे लक्ष देणार आहे, असेही साबळेने सांगितले.