-अमित डोंगरे
बीसीसीआयने जर परवानगी दिली तर एकेरी व दुहेरी धावा पळून काढण्यासाठी मी माझ्या घरचा एक नोकर नियुक्त करीन, असे वक्तव्य एकदा सौरव गांगुलीने केले होते. यावरूनच जगातिक अनेक नामवंत फलंदाजांना अशा चोरट्या धावा घेण्याचा कंटाळा येतो हेच स्पष्ट झाले होते. जीवावर आल्याप्रमाणे गांगुलीच नव्हे तर अनेक फलंदाज अशा धावा घेताना अनेकांनी पाहिले असेल.
यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतही हेच चित्र प्रमुख फलंदाजांच्या बाबतीत दिसून येत आहे. मार्चपासून देशात करोनाचा धोका सुरू झाला व जनजीवनच नव्हे तर क्रीडाक्षेत्रही ठप्प झाले. त्यातच क्रिकेटलाही फटका बसला. त्यानंतर जवळपास सहा महिन्यांच्या खंडानंतर अमिरातीत आयपीएल स्पर्धा खेळवली जात आहे. इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाहताना एक गोष्टी प्रकर्षाने लक्षात येते की खेळाडूंच्या तंदुरुस्तीत खूप मोठे बदल झाले आहेत.
स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, सौरभ तिवारी यांच्यासह खुद्द महेंद्रसिंग धोनीही आळसावल्यासारखा वाटत होता. ज्याच्या तंदुरुस्तीचे दाखले नवोदित खेळाडूंना दिले जात होते तोच धोनी दुहेरी धावा काढताना थकत असल्याचे स्पष्ट दिसून आले. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्येकाच्या बाबतीत हे घडू शकते. मात्र, एकीकडे भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली, एबी डीविलियर्स यांनी ज्या पद्धतीने स्वतःला या काळात मोल्ड केले त्याचे कौतुक वाटते.
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हे नेहमी म्हणायचे की त्यांना प्रत्येक चेंडूवर धावांचा आकडा दिसतो. 1, 2, 3, चौकार, षटकार मात्र, एकाही चेंडूवर शून्य दिसत नाही. म्हणजेच त्यांची प्रतिभा इतकी मोठी होती की त्यांनी एखादा चेंडू प्लेड केला तरी गोलंदाज आश्चर्यचकित होत असे. भारतीय फलंदाजांबाबत बोलायचे झाले तर सध्याच्या संघाचा अपवाद वगळता कोणीही तिहेरी धाव घ्यायला तयार नसायचा.
आपल्याकडे ही परंपरा आधी सचिन तेंडुलकरने आणली तर धोनी व कोहली यांनी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू असतानाही दुहेरी धाव घेण्याचे कसब त्यांनी शिकवले. भारतीय क्रिकेटचा चेहरा खरेतर आळशी नव्हता. मात्र, फलंदाजांनी अशा चोरट्या धावा कधी घेतल्याचे दाखले दिले जात नव्हते. महंमद कैफने चोरट्या धावा घेण्याचे तंत्र विकसित केले. आज कोहली ज्या पद्धतीने अशा धावा घेतो ते पाहुन सुसाट या शब्दाचा अर्थ लक्षात येतो.
कलेचा विसर…
मर्यादित षटकांच्या सामन्यात पूर्वी पाकिस्तानचे गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्यात माहीर होते. तीच कला आता भारताचे जसप्रीत बुमराह व महंमद शमी उपयोगात आणताना दिसतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वेगवान गोलंदाजांनी एक नवा चेंडू शोधला होता. नक्कल बॉल असे या चेंडूला संबोधले जाते.
चेंडूची सीम नेहमीप्रमाणेच ग्रीप करून प्रत्यक्षात टाकताना बोटे ढिली ठेवली जातात. हा चेंडू नेहमीच्या वेगाने येईल असा अंदाज फलंदाज बांधतो व त्याच्या संथ वेगाने चकतो. ही कला भारताच्या भुवनेश्वर कुमारने सर्वप्रथम वापरली व आता त्याला जागतिक लोकप्रियता लाभली आहे. अशा चेंडूवर फलंदाज आक्रमक फटका एकतर मारूच शकत नाही किंवा असा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर त्याची बाद होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये हे चेंडू गायबच झाल्यासारखे वाटत आहेत. राजस्थान व चेन्नईच्या तसेच कोलकाता व मुंबईच्या सामन्यात हा चेंडू दिसला. मात्र, इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर प्रमुख गोलंदाजांना त्यांना हवा तसा सराव मिळालेला नसल्याने हे चेंडू गायबच झाले की काय असा प्रश्न पडू लागला आहे.