नवी दिल्ली: देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले निर्बंध शिथिल करू नयेत, अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची मुदत 31 मेपर्यंत आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे यादिवशी विविध मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. त्यानंतर राज्यांची मते विचारात घेऊन लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्या नियमावलीतील निर्बंध शिथिल केले जाऊ नयेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असे भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे.
नव्या नियमावलीच्या आधारे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन्सची वर्गवारी करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा पहिला टप्पा 25 मार्चपासून लागू झाला. त्यानंतर तीनवेळा लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे.