मुंबई – राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे. चार-पाच पक्ष बदललेला अध्यक्ष असेल तर न्यायाची अपेक्षा ठेवणे आणखी चुकीचे आहे असे मत बापट यांनी व्यक्त केले आहे.
बापट म्हणाले की, आपली संसदीय लोकशाही ब्रिटनवरून घेण्यात आली आहे. तिथे सभागृहाचा अध्यक्ष पंचप्रमाणे काम करतो. तिथे सभागृहाचा अध्यक्ष निवडला गेल्यानंतर तो पक्षाचा राजीनामा देऊन पुढे काम पाहतो. आपल्याकडचा अध्यक्ष कुठल्यातरी पक्षाचा सदस्य असतो, त्यामुळे त्याच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यात जर चार-पाच पक्ष बदललेला अध्यक्ष असेल तर त्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणे आणखी चुकीचे आहे.
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार आहे, हे आता आपल्या सर्वांनाच कळले आहे. पण निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान करतात. ६५ वर्षांनंतर त्यांना योग्य कामाची बक्षिसी देण्याचे कामही पंतप्रधान करतात, त्यामुळे मी त्यांच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करत नाही.
आता प्रश्न राज्यपालांचा असेल, तर त्यांचीही निवड पंतप्रधानांच्या सूचनेवर राष्ट्रपती करत असतात. ज्या पदावरील लोकांनी तटस्थपणे पंचाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे, त्यांची विश्वासार्हता घसरताना गेल्या काही काळापासून आपल्याला दिसत आहे, असे महत्त्वाचे विधान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केले.