कर्जत -राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करून करोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू आहे. कर्जत तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ. सुनिल गावडे, शहराध्यक्ष वैभव शहा, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड, वरद मेहेत्रे यांच्याकडून तहसीलदार सी.एम.वाघ यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती डॉ. गावडे यांनी दिली.
राज्यातील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी, तहसिलदारांना यांना निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. भाजपाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात येत असून त्यातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. कर्जत येथे तहसीलदार यांना निवेदन देताना भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाचा भाग म्हणून शुक्रवारी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहून राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करणार आहेत. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही हातावर पोट असलेल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, अशी भाजपाची प्रमुख मागणी आहे.