दौंड -महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दौंड तहसील कचेरीवर विविध मागण्यांबाबत भाजपच्यावतीने मंगळवारी (दि. 25) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी योजना फसवी असल्याची टीका मान्यवरांनी केली.
यामध्ये अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये व फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती, मात्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना जेवढी मदत जाहीर केली तेवढीच मदत शेतकऱ्यांना मिळाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा ही घोषणाच राहिली आहे. सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करू अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्या होत्या, यापैकी कोणतेही आश्वासन पाळले नाही. सध्या झालेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, सरचिटणीस तानाजी दिवेकर, राजाभाऊ तांबे, तालुकाध्यक्ष गणेश आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा, स्वप्नील शहा आदी याप्रसंगी उपस्थित होते.