पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने सुद्धा महापालिकांना मदत केली पाहिजे. पुण्यात चाचण्यांची क्षमता कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.
पुण्यात चाचण्यांची व्यवस्था आणखी वाढविली गेली पाहिजे, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. पुण्यात कोरोना प्रादुर्भावाचा दर गेल्या काही दिवसांत 18 टक्क्यांवर गेला आहे. मृत्यू रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. कोरोनाची स्थिती, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्यात काही कमतरता असली तर त्या शासनापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने पुणे आणि सोलापूरचा हा प्रवास असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रशासन चांगले काम करीत असले तरी खाजगी रूग्णालयाचा समन्वय यात प्रशासन अपयशी ठरते आहे. रूग्णांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. एका कुटुंबातील दोघे-तिघांना उपचार घ्यावा लागला तर त्यांचे दिवाळे निघते आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
- कुणाला कमी लेखण्याची ही वेळ नाही. टीका करण्याची तर अजीबात नाही. पण, कुठे काही कमतरता राहत असेल तर ती निदर्शनास आणून देणे, हे आपले कर्तव्य आहे.
- आकडे कमी करण्याच्या नादात रणनीती चुकायला नको.
- संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून रूग्ण ओळखतो येतो आणि त्यातून इतरांना सावध करता येतं. हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो जगाने स्वीकारला आहे.
- मंत्र्या-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही.
- मंत्री-प्रशासनात समन्वय नाही.
- आघाडीतील तीन पक्षात समन्वय नाही.
- हा समन्वय प्रमुखाने घडवायचा असतो. समन्वय योग्य असेल तरच लढाई जिंकता येते.