सातारा -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. केंद्राकडून राज्य सरकारला वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब असून लोकांचे हाल होत आहेत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असे आम्ही म्हणणार नाही. मात्र, करोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, खासगी क्षेत्रातील नोकर आणि वेतन कपात धोकादायक असून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, किशोर गोडबोले, विकास गोसावी, विजय काटवटे, दत्ताजी थोरात, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे आदी उपस्थित होते. भांडारी म्हणाले, “मोदी सरकारने धाडसी निर्णय घेतल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला आहे. वेळोवेळी राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. आर्थिक मदतीचे निर्णय घेतले जात आहेत.
राज्यात करोनाची स्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारने केंद्राच्या निर्देशानुसार उपाययोजना करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.’ करोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने एक लाख 70 हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
कोट्यवधी लोकांना मोफत धान्य , शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलाना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या.
शेतकरी, लघु उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सातारच्या प्रश्नांना दिली बगल
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा नगरपालिकेत सत्ता आहे. या पालिकेत लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला. यातून “पार्टी फंड’ म्हणून पाच टक्के निधी जातो तो कोणाला जाता, नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष आज तुमच्या व्यासपीठावर आहेत, त्यामुळे नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे का, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे का उपस्थित नाहीत, अशा साताऱ्याशी निगडित अनेक प्रश्नांना माधव भंडारी यांनी बगल दिली.