लडाख – चिनी लष्करासोबत निर्माण झालेल्या तणावाला हिंसक वळण लागले असून संघर्षात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि 20 जवान शहीद झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. गेल्या 45 वर्षांत चीनशी असा स्वरूपाचा प्रथमच संघर्ष निर्माण झाला आहे. गेले पाच आठवडे सीमेवर तणावाचे वातावरण आहे. चिनी माध्यमांनी चीनचे 43 सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे.
नेमके काय घडले?
– या भागातील तणाव कमी करण्यासाठी गलवान खोऱ्यात गस्तीनाका क्र. 14 जवळ चर्चा सुरू असतानाच दोन्ही फौजा एकमेकाला भिडल्या.
– या संघर्षात एकही गोळी उडवली गेली नाही. मात्र, दगड, सळ्या आणि लाकडी दांडक्यांचा सढळ वापर करण्यात आला. त्यात तीन भारतीय जवान शहीद झाले.
– चीनच्या लष्कराकडून भारतीय जवानाचा मृत्यू होण्याची ही 1975 नंतरची गेल्या 45 वर्षातील पहिली घटना आहे. 1975 मध्ये चार भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे हा संघर्ष उडाला होता.
– घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह संरक्षण दलप्रमुख आणि लष्कराच्या तीनही दलांसोबत चर्चा. सिंह यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिस्थितीची कल्पना.
– चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सचा भारतानेच आक्रमण केल्याचा कांगावा. सीमा ओलांडून भारतीय जवानांनीच चिनी सैनिकांना मारहाण केल्याचा दावा.
– सीमेवरील तणाव कमी करण्याचे एकमत. भारतीय जवानांनी दोनदा सीमा ओलांडली. चिनी सैनिकांना मारहाण केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन यांचा दावा.
चीनच्या एकतर्फी हालचालींमुळे संघर्ष
विभागातील “जैसे थे’ स्थिती बदलण्याच्या एकतर्फी हालचाली चीनने केल्यामुळे संघर्ष झाल्याचे भारताने स्पष्ट केले. भारताची रास्त बाजू मांडणारी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. भारत आणि चीनमध्ये काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत झालेल्या सहमतीचे पालन चीनने केले असते तर दोन्ही बाजूंची झालेली जीवितहानी टाळली जाऊ शकली असती. भारताची भूमिका नेहमीच सीमेचा आदर करण्याची राहिली आहे. चीनने त्यात हस्तक्षेप केल्याने संघर्ष उभा राहिला.