पिंपरी – आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे गलेलठ्ठ पगार, भरपूर सुविधा आणि उच्चभ्रू जीवनशैली असे काहीसे चित्र आहे. एवढे सगळे असताना या क्षेत्रात नोकरीची शाश्वती नसल्याची ओरड मात्र आहे. बड्या कंपन्यांची हायर ऍड फायर पॉलिसी, ले ऑफ पॉलिसी आयटीयन्सला धडकी भरवितात. परंतु गेल्या एक वर्षापासून परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. स्टॉर्टअपचे वारे आता बड्या कंपन्यांना धक्के देऊ लागले आहेत. आयटीयन्स देखील कम्फर्ट झोनमूधन बाहेर पडत जोखीम स्वीकारत आहेत. परिणामी गेल्या एक वर्षापासून बड्या आयटी कंपन्यांमध्ये सुरू असलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू झाले आहेत. त्यापैकी काही आयटीयन्सने स्टार्टअप सुरू केले आहेत. आपले निश्चित एकाच प्रकारचे काम सोडून आयटीयन्सने आपल्या कार्यकक्षा रुंदावल्या आहेत.तसेच इतरही क्षेत्रातील स्टार्टअपमध्ये आयटीयन्सने नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. यामुळे बहुतेक बड्या कपंन्यांमध्ये ऍट्रीशन रेट म्हणजे कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक दिसून येत आहे.
शेकडो नव्या कंपन्यांची नोंदणी
गेल्या एका वर्षात खूप मोठ्या प्रमाणात नव्या कंपन्यांची नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. नव्या कंपन्यांना तंत्रज्ञान, प्रशिक्षण व इतर सुविधा देणाऱ्या एका बड्या ऑनलाइन कंपनीने आपल्या वेबसाइटवर रजिस्टार ऑफ कंपनी, पुणे येथे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जुलै महिन्यात नोंदणीकृत झालेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची यादी प्रकाशित केली आहे. त्यानुसार एका महिन्यात सुमारे शंभर नव्या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. या कंपन्यांमध्ये अनेक आयटीयन्स आपल्या करियरच्या दिशा शोधत आहेत.
नवी झेप, नव्या संधी
स्टार्टअपमध्ये आयटीयन्स झेप घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. स्टार्टअपमध्ये चांगला पगार आणि ड्रीम पोस्ट मिळत असल्याने अनेक आयटीयन्स आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नवी झेप घेत आहेत आणि नव्या संधीही शोधत आहेत. केवळ आयटीच नव्हे तर अनेक आयटीयन्सने वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या आयटीतील अनुभवाचा वापर करुन घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काही खासगी शैक्षणिक संस्था, बडे बांधकाम व्यावसायिक यांनी देखील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
थेट क्लाइंटशी संपर्क
रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक युरोपियन कंपन्यांनी आपली कामे भारतीय कंपन्यांना देण्यास सुरुवात केली आहे. त्यात स्टार्टअपलाही काम मिळत असल्याचे दिसून येत आहे. बड्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आयटीयन्सचे थेट क्लाइंटशी संपर्क येत असल्यामुळे आणि त्यांच्या कामाचा आवाका विदेशात बसलेल्या क्लाइंटला माहीत असल्यामुळे स्टार्टअपला काम मिळण्यास मदत होत आहे.
करोनाकाळानंतर खूप मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू झाले आहेत. तसेच युरोपीय देशांमधून भारतीय आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळत आहे. यामुळे बड्या कंपन्यांमध्ये देखील भरती आहे, तसेच स्टार्टअपलादेखील काम मिळत असल्याने स्वतःच्या अटी-शर्तींवर काम करणाऱ्या आयटीयन्स आता नोकरी सोडण्याचे जोखीम पत्करत आहेत. यात अनेक आयटीयन्स यशस्वी झाल्यामुळे अनेकांनी बड्या कंपन्यांचा मोह सोडला असल्याचे दिसून येत आहे.
– हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नॅसेंट इर्न्फोमेशन ऍण्ड टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट
वैयक्तिक पातळीवरही काम
काही आयटीयंन्सने वैयक्तिक पातळीवरही काही क्लाइंटसोबत ऍग्रीमेंट केल्याची उदाहरणे दिसून येत आहेत. एका बड्या कंपन्यामध्ये काम करत असलेल्या दोन तरुणांनी नोकरी सोडली आणि नवी नोकरी शोधण्यासाठी काही प्रोफेशनल्स साइट्सवर आपली माहिती अपलोड केली. ती माहिती पाहून ते ज्या प्रोजेक्टवर काम करत होते त्या क्लाइंटने थेट त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर कामाचा करार केला. हे तरुण त्या बड्या कंपनीत ज्या क्लांइटसाठी 30 ते 35 हजार रुपये पगारावर काम करत होते. तोच क्लाइंट आता या तरुणांना महिन्याचे एक ते सव्वा लाख रुपये देत आहे. या प्रकारांमुळे अनेक बड्या कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांच्या जॉइनिंग लेटरमध्ये काही नव्या अटी घातल्या. ज्यात प्रामुख्याने नोकरी सोडल्यानंतर ठराविक कालावधीपर्यंत प्रतिस्पर्धी कंपनी आणि कंपनीच्या क्लाइंटसोबत काम न करण्याची अट घालण्यात आली आहे.