मुंबई – शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे एकाही गटाने कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तर आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये, असे पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दस्ताऐवज सादर करण्यास सांगितले होते. दस्ताऐवज सादर करण्याची आज शेवटची तारीख होती. पण दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही गटाकडून कोणतीच कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार दोन्ही गटांना पक्षांतर्गत निवडणुकीचा इतिहास, नेत्यांना देण्यात आलेली जबाबदारी, पक्षाचे संविधान आणि त्याचा विस्तृत अहवाल, पक्षाच्या विविध शाखांची रचना, त्यातील सदस्यांची संख्या आणि त्यांचा पाठिंबा असल्याचे पुरावे आदी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करायचे होते. पण कोणत्याही गटाने ही कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला कागदपत्रे देण्यासाठी मुदतवाढ मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कोर्टातील प्रकरण संपेपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाला तूर्तास “वेट अँड वॉच’च्या भूमिका घ्यावी लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग आणि मंत्रिमंडळाच्या लांबलेल्या विस्ताराकडे देशभरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
शिवसेनेच्या याचिकेवर 12 ऑगस्टला सुनावणी
शिवसेनेवर अधिकार कुणाचा? आणि 16 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या मुद्यावर आता 12 आगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. “खरी शिवसेना आमचीच’ असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ही याचिका घटनापीठाकडे पाठवायची की नाही? ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडून आज स्पष्ट होणार होती. परंतु, या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 12 तारखेला सुनावणी होणार आहे. शिवसेनेने केलेली निलंबनाची कारवाई या मुद्यावर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने असून दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मागच्या सुनावणीत तर्कवितर्क मांडले होते.