नगर -उड्डाणपूल रोडवरील साईड गटार दुरुस्तीबाबत आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पाहणी करून बैठकीचे आयोजन मनपा कार्यालयात करण्यात आले होते. तात्पुरत्या स्वरुपात सदर रस्त्यावर पाणी साचणार नाही. यासाठी उपाययोजना करून तातडीने काम सुरू करावे, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दिवाण यांना दिल्या.
आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील सक्कर चौक, अक्षता गार्डन, कोठी चौक व सीएसआरडी कॉलेज या रस्त्यांच्या दरम्यान पावसाळ्यामध्ये तीन ते चार फुटांपर्यंत रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो.
तात्पुरत्या स्वरूपात या चार ते पाच ठिकाणचे पाणी निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी मनपा व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने प्लॅन तयार करावा. जेणेकरून पुढील पावसाळ्यात हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.
यावेळी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता सुरेश इथापे, उद्योजक अफजल शेख, जलअभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप यांनी मनपा प्रशासनाला सांगितले की, नगरोत्थान योजनेतील बालिकाश्रम रोड, मुकुंदनगर, सक्कर चौक ते कोठी रस्ता, महात्मा फुले चौक परिसरातील रस्ता या सर्व रस्त्यावरील साईट गटारी स्वच्छ करण्याचे काम तातडीने सुरू करावे. एका बाजूने टॅंकरद्वारे पाणी टाकावे तर दुसऱ्या बाजूला पाणी निघाल्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा करावे. असेच काम संपूर्ण शहरभर करावे, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या.