पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरातील एसटी स्थानकांवरील प्रवासी संख्या घटल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यांपासून प्रवासी संख्या कमी झाल्याने शहरातून राज्यभरात जाणाऱ्या काही बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शिवाजीनगर (वाकडेवाडी), स्वारगेट व पुणे स्टेशन या स्थानकातून दैनंदिन फेऱ्या मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव असलेली संख्या वाढल्याने प्रवासी भीतीपोटी प्रवास टाळत असल्याचे दिसून येते. यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून बस स्थानकांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. परिणामी, महामंडळाचा महसूल बुडत आहे.
शिवाजीनगर आगारातून मुंबई-पुणे मार्गावर दररोज 25 फेऱ्या होतात. मात्र, रविवारी प्रवाशांची संख्या कमी असल्याने पाच फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबादकडे जाणाऱ्या फेऱ्याही कमी करण्यात आलेल्या आहेत. दररोज प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे संचलन सुरू असून नेहमीपेक्षा गर्दी कमी असल्याचे शिवाजीनगर आगाराचे व्यवस्थापक अनिल भिसे यांनी सांगितले.
13 आगारांतून सरासरी फक्त सव्वा लाख प्रवासी
एसटीच्या पुणे विभागातील 13 आगारांमधून दररोज सुमारे 3 लाखांवर प्रवाशांचे संचलन होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सरासरी सव्वा लाख प्रवाशांनीच प्रवास केल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे एसटीच्या बहुतांश बसेस रिकाम्याच धावत असल्याचे दिसून येते.