नगर – शहरातील चोऱ्या, दिवसा घरफोड्या, सोनसाखळी पळविणे, दुचाकी, मोबाइलची चोऱ्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहरात चोवीस तास दहा दुचाकींवर 40 कर्मचाऱ्यांची गस्त सुरु केली आहे. त्यामुळे भुरट्याचोऱ्यांना आळा बसणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून बोलले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी मोठ्या घरफोड्या, चोऱ्या, दुचाकीवरून धूम स्टाइलने महिलांच्या गळातील दागीने ओरबडणे, पर्स पळविणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
यामुळे शहरातील नागरिक सुरक्षित राहिलेले नाहीत. दिवसा घर बंद करून बाहेर किंवा बाहेरगावी जाणे धोक्याचे झाले आहे. अलीकडच्या काळात कल्याण रोड, रेल्वेस्टेशन, बालिकाश्रम रोड, गुलमोहर रोड, सावेडीगाव, केडगाव परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. कल्याण रोड, रेल्वेस्टेशन परिसरात दिवसा फ्लॅट फोडून लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत अनेक नगरसेवकांनी पोलीस चौकीची मागणी केली होती. तसेच रात्रीच्या वेळी गस्त सुरु करावी अशी मागणी होत होती.
प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन मोटार परिवहन विभागाकडून दहा दुचाकी तयार करून घेतल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता तेथे पाच दुचाकी, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चार दुचाकी तर, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत एक अशा दहा दुचाकीवरून शहरात दररोज चोवीस तास गस्त असणार आहे. यासाठी तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील 20 कर्मचारी व मुख्यालयातील 20 कर्मचारी अशा 40 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून त्यानुसार पोलिसांनी गस्त सुरु केली आहे. तसेच त्या दुचाक्याना जीपीएस बसविण्यात आले आहे.