नगर – प्रशासनाच्यावतीने शहरात काही भागात जनतेला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतांश टॅंकरला गळती लागली आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत केवळ 50 ते 60 टक्केच पाणी पोहच होत असून या गळक्या टॅंकरमधून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. गळक्या टॅंकरमुळे पाण्याची होत असलेली नासाडी थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील अनेक भागात पाण्यांची टंचाई निर्मान होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. तसेच वारंवार पाइपलाइन फुटल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात ज्या ठिकांणी नळाद्वारे पाणी पुरवठा होत नाही त्याठिकांणी टॅंकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतांश टॅंकरला गळती लागलेली असून, उद्भवापासून पाणी भरुन निघालेले टॅंकर रस्त्यावरुन जाताना शहरातील नागरिकांपर्यंत जाइपर्यंत 20 ते 30 टक्के रिकामे होतात.
निम्मे अधिक पाणी रस्त्यानेच गळत असल्याने पाण्यासाठी टॅंकरकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांपर्यंत केवळ 50 ते 60 टक्केच पाणी पोहोच होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. या गळक्या टॅंकरमुळे नगर शहरात काही भागात फक्त 500 ते 700 लिटर पाणी दिले जाते. परंतु नागरिकांना पुढील पाणी येण्यासाठी वाट पहावी लागते. प्रशासन मात्र पाणी पट्टी, घरपट्टी वसूल करते. मात्र मूलभूत सुविधा का देत नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पाण्याच्या टॅंकरची दुरुस्ती करावी
“पाणी वाचवा देश वाचवा’ हा संदेश प्रशासनाकडून वेळोवेळी दिला जातो. मात्र प्रशासनाकडूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. तातडीने ही नासाडी थांबवावी, सर्व नादुरुस्त टॅंकरची दुरुस्ती करावी, दूध, पेट्रोल, डिझेलच्या टॅंकरप्रमाणे पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.