कोलंबो – श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या 12 मच्छिमारांना अटक केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत त्यांनी पकडलेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या 55 झाली आहे. मन्नारच्या दक्षिण भागात मच्छिमारांची ही धरपकड करण्यात आली आहे. कालच नौदलाने डेल्फ्ट बेटाच्या भागात 43 भारतीय मच्छिमारांना पकडले होते. हे मच्छिमार ज्या भागात मासेमारी करीत होते तो श्रीलंकेच्या सागरी हद्दीचा भाग होता असे लंकेच्या नौदलाचे म्हणणे आहे.
स्पीड बोटीच्या सहाय्याने भारतीय मच्छिमारांच्या बोटींना घेरून या एकूण आठ बोटी त्यांनी श्रीलंकेच्या किनाऱ्यावर ओढून नेल्या. दोन्ही देशांच्या नौदलाकडून एकमेकांच्या मच्छिमारांची धरपकड करण्याचे प्रकार या भागात सातत्याने सुरू असतात. त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यास अजून यश आलेले नाही, त्याचा मोठा त्रास मात्र मासेमारी करण्यांना होत आहे.