पिंपरी – शिशिरातील थंडीचा यंदा शहरात काही दिवसच मुक्काम होता. तर आता वसंत ऋतूमध्ये जवळपास महिनाभरात झाडांची पानगळ सुरु झाली आहे. पर्णहीन झालेले वृक्ष, हलके हलके उबदार होत जाणारे वातावरण असे एकंदरीत चित्र आहे. काही दिवसांतच त्यांच्या अंगा-खांद्यांवर हिरवीगार पाने, कळ्या, फुले फुलू लागल्या असून सर्वत्र रंग-गंधाची उधळण अनुभवायला मिळत आहे. या निसर्गाच्या अविष्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचा पक्ष्यांनी घरटी बांधायला सुुरुवात केली आहे.
मराठी वर्षातील माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतुची सुरुवात होते, असे मानले जाते. फाल्गुन चैत्र महिन्यात वसंत ऋतू येतो, मराठी वर्षाचा शेवट व पुढच्या मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे वसंत ऋतू. इंग्रजी महिन्यातील फेब्रुवारी व मार्च महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत येणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत ऋतुचे आगमनाची चाहुल निसर्गात होणाऱ्या बदलांमधून जाणू लागली आहे. सध्या निसर्गात विविध रंगांची, सुंगंधाची उधळण सुरु आहे.
यंदा वातावरणातील बदलाने शिशिर ऋतू संपल्याची जाणीवदेखील झाली नाही. माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला सुरु होणाऱ्या वसंत ऋतूचे यंदा माघ शुक्ल षष्ठीला (दि.18 फेब्रुवारी) आगमन झाले आहे. आता पानगळीला सुरुवात झाली आहे. तर वातावरणात मोहरलेला आंबा, फुललेला पळस, बहरलेला गुलमोहर, नटलेली आसावरी, पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजलेला चाफा, पांगरी, शाल्मली, दाही दिशांत सुगंध उधळणारा मोगरा, झुडपातून डोकावणारी करवंदे, टरबूज कोवळ्या काकड्या, चिंचा, झाडांच्या पानातून डोकावणाऱ्या हिरव्या कैऱ्या, कलिंगड अशा रसदार फळांचा हंगाम मन मोहून घेत आहे.
वसंत म्हणजे बहर म्हणजे वृक्षांचा, झाडावेलींच्या सौंदर्याचा परमोच्च काळ. पण त्याआधी येणारी पानगळ देखील त्या त्या झाडावेलींचं एक वेगळं सौंदर्य दाखवून जात आहे. आधी हिरवी असलेली पाने हळूहळू पिवळी होत जातात आणि पानगळ सुरु होताच बघता बघता झाड पूर्ण निःष्पर्ण होऊन जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.