शिक्षणाचा नवा मार्ग दाखवून रंजल्या गांजल्यांचा उद्धार करणारे समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. आज 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती. त्यानिमित्त…
गुलामगिरी, जातिभेद, वर्णभेद यासारख्या समाजविघातक प्रवृत्तींचा मुळापासून बीमोड करण्यासाठी तसेच हरिजन, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा तसेच परित्यक्ता स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले आयुष्याच्या अंतापर्यंत प्रखरपणे निकराने लढले. सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी ते केवळ विचार मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी कृतिशील बंड केले.
बहुजनांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणाअभावी या देशातील फार मोठा वर्ग आडला, नाडला व शोषला जातो, हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले होते.
यावर जालीम उपाय म्हणजे बहुजन समाज शिकून शहाणा झाला पाहिजे, आपले हित-अहित त्याला स्वतःलाच समजले पाहिजे, त्याची होणारी फसवणूक व पिळवणूक थांबली पाहिजे. बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा तसेच अंधारात पुरता बुडाला होता. अठरा विश्व दारिद्य्राच्या फेऱ्यात तो गुरफटलेला होता. हे सर्व वास्तव पाहून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या अर्थपूर्ण अशा रचनेत मांडले. ती रचना बहुजनांचा उद्धार आता संपूर्ण जगभरात महामंत्र झाली आहे. ती म्हणजे-
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके सारे अनर्थ ।।
एका अविद्येने केले ।।।
शिक्षणाबरोबरच ते स्त्री स्वातंत्र्याचेही प्रवर्तक होते. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील स्त्रियांचे प्रचंड हाल आणि जाच ते उघड्या डोळ्यांनी पाहात होते. धर्माच्या नावाखाली स्त्रियांना शतकानुशतके अज्ञान आणि अंधःकारात बंदिस्त करून ठेवले होते. अत्यंत दयनीय झालेल्या स्त्री वर्गाची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पहिले धाडशी पाऊल उचलले. अर्थात, असे धाडस सर्वप्रथम जोतीराव फुले यांनीच केले. पुण्यासारख्या अत्यंत कर्मठ आणि सनातन विचारांचे प्राबल्य असलेल्या शहरात पहिली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचे एक नवे पर्व सुरू केले. पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू केलेली ही शाळा भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून ती गणली जाते.
बारा वर्षांखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यांनी स्वत:च्या पत्नीला, सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिक्षित केले आणि “जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला उद्धारी’ या शब्दांत स्त्री वर्गाचा गौरव केला. समाजातील तळागाळातील लोकांमध्ये आपल्या हक्काची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी “गुलामगिरी’ हे पुस्तक लिहिले. बहुजन समाजात शैक्षणिक व सामाजिक विकास घडविण्यासाठी जनजागृती केली. कोणताही माणूस जन्माने अथवा जातीने श्रेष्ठ-कनिष्ठ नसून तो आपल्या कर्तृत्वाने लहान-मोठा ठरत असतो, हा विचार त्यांनी सर्वश्रृत केला. सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेली समाजव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी, या मुख्य उद्देशाने त्यांनी “सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली.
जोतीराव फुले हे लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होत. लोकशाही ही जीवनप्रणाली व्हावी, गरीब-श्रीमंत, उच्च-कनिष्ठ, मालक-मजूर ही मांडणी केवळ लोकशाही प्रणालीच बदलू शकते यांवर त्यांचा विश्वास होता. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा, समाज परिवर्तन, न्यायाधिष्ठित समाज निर्मिती या गोष्टी लोकशाहीतच घडू शकतात, यात कोणालाही अमर्याद स्वातंत्र्य नसते, सर्व स्त्री-पुरुष, नागरिक कायद्यापुढे समान असतात, असे ते म्हणत.
मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी “सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक लिहिले. यात श्रमप्रतिष्ठेला त्यांनी महत्त्व दिले. परिश्रम आणि पराक्रम यांचा दुरान्वयानेही संबंध नसणाऱ्या आईतखाऊ वर्गाचा फसवणुकीचा डाव त्यांनी ओळखला होता. धार्मिक सहिष्णुता, गुलामगिरीस विरोध, जातिभेदाला विरोध, वर्णभेदाला फाटा, आचार-विचार स्वातंत्र्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन ही मूलभूत तत्त्वे त्यांनी या पुस्तकात अंतर्भूत केली होती.
शेतकऱ्यांना दिलासा व त्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या मुला-मुलींना सक्तीचे शिक्षण यांवर त्यांनी लिहिलेले “शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक आजही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे. शेतमालाला योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांचे कसे आर्थिक शोषण होते, हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. तसेच शेतकरी सावकाराच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी सावकाराच्या विरोधात आवाज उठवला. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ लागलेल्या होत्या, यासाठी त्यांनी सरकारला “ऍग्रीकल्चरल रिलीफ ऍक्ट’ संमत करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते. अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्यांची मालिका पाहिली की, जोतीरावांचे शतकांपूर्वीचे कार्य किती बहुमोल होते याची कल्पना येते.
कामगारांच्या अस्मितेला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. मूठभर भांडवलदारांच्या विरोधात संघटित लढा देण्यासाठी व मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर केले. बौद्धिक गुलामगिरी, सामाजिक विषमता व उच्च वर्णीयांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाला पायबंद घालण्यासाठी त्यांनी प्रखरपणे व निर्भीडपणे लढा दिला.
जोतीराव फुले हे आद्य महात्मा होत. ते भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी व कामगारांच्या दु:खाचे व दारिद्य्राचे निर्मूलन करणारे पहिले पुढारी होत. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातिभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतिपुरुष होत. तसेच मानवी समानतेची शिकवण देणारे पहिले लोकनेते होत. भारतीय समाज क्रांतीचे जनक आणि भारतातल्या सामान्य जनतेचा नवयुगाचा प्रेषित असा त्यांचा उल्लेख विचारवंतांनी व समाज शास्त्रज्ञांनी केला आहे, तो सार्थच आहे.
डॉ. सुनीलकुमार सरनाईक