नगर – वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महावितरण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणकडे आत्कालीन यंत्रणा, व्यवस्थापन नसल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा त्रास नगरकरांना सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल, नगरसेवक दत्ता कावरे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, सुरेश तिवारी, संदीप दातरंगे, डॉ.श्रीकांत चेमटे, प्रशांत गडाख, अरुण झेंडे, सचिन गोरे, घनश्याम घोलप आदी उपस्थित होते.
संभाजी कदम म्हणाले, “येत्या काळात पावसाळा सुरु होणार आहे, त्यावेळी पुन्हा अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पुर्वीच महावितरणने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, दुरुस्तीची कामे पूर्ण करावे. आपत्कालीन व्यवस्था, यंत्रणा सज्ज ठेवावी. गरज पडल्यास पर्यायी यंत्रणा तयार ठेवावी. खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक व व्यवसायिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई महावितरण प्रशासनाला द्यावी लागेल.”