पुणे – ‘सर्वसामान्य, गरीब रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळत नाहीत. बरे वाटत नसतानाही रुग्णांना डिस्चार्ज दिला जातो. तर कारागृहातून आलेल्या कैद्यांना मात्र स्पेशल रुममध्ये उपचार देतात. तेही आठ ते नऊ महिने? असा कोणता आजार होता?’ असे प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत ससून ड्रग्ज प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.
दानवे यांनी शुक्रवारी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा आढावा घेतला. त्यानंतर दानवे म्हणाले, “ससून रुग्णालयामध्ये महिनोंमहिने कैद्यांची बडदास्त कोणाच्या आशीर्वादाने ठेवली जाते? पोलिसांचा बंदोबस्त असतानाही ललित पाटील पळून गेला ही गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का? आगामी नागपूर अधिवेशनात याविषयी आवाज उठवणार आहोत.’
ससूनमधील परिस्थिती भयावह
“मागील दोन वर्षांत हाफकिनकडून किंवा नवीन खरेदी प्राधिकरणामार्फत एक रुपयाचेही औषध ससूनला मिळालेले नाही. पुरेसे डॉक्टर नाहीत. झीरो प्रिस्क्रिप्शन म्हणाणाऱ्या ससूनमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागतात. बेड नाही, माता मृत्यूचे प्रमाण अधिक असून, एकंदरीत परिस्थिती भयावह आहे,’ असे दानवे यांनी सांगितले.
ललित पाटील प्रकरणानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता, डॉ. ठाकूर मात्र स्पष्टपणे काहीही बोलत नाहीत. त्यावरून त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या प्रकरणात हात असल्याचा संशय आहे. येथील डॉक्टर आणि अधिष्ठाताना रुग्णांना उपचार, मुलांना शिक्षण देतात, की कैद्यांचे पालनपोषण करतात?
– अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद