संचालक मंडळाची कामगार संघटनेबरोबर झाली बैठक
कापूरहोळ – राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, सर्व संचालक मंडळ आणि राजगड कामगार संघटना यांच्यामध्ये गुरुवारी (दि. 26) महत्त्वपूर्ण बैठक होऊन गळीत हंगाम 2023-24 सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. मशिनरी मेंटेनन्स आणि गळीत हंगाम चालू करण्याच्या पूर्वतयारीसाठी आज (दि. 27) पासून सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. यावेळी कामावर उपस्थित झालेल्या सर्व कर्मचान्यांचे कारखान्याच्या वतीने स्वागत करण्यात आले, तर कामगारांच्या वतीने कारखान्याच्या नवनिर्वाचित कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील म्हणाले, गळीत हंगाम 2023-24 साठी मागील 3 ते 4 महिन्यांपासून कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे , सर्व संचालक मंडळ हे कारखाना सुरू ठेवण्यासाठी राज्य शासन, बॅंका व आर्थिक संस्था यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहोत, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मदत करण्याचे ठरविलेले असून, शासन हमीवरील कर्ज मिळण्याचे दृष्टीने देखील कारखान्याने प्रस्ताव सादर केलेला असून शासन दरबारी लवकरच मंजूर होऊन कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या उपलब्ध निधीमधून शेतकऱ्याचे उर्वरीत उसाचे पेमेंट, तोडणी वाहतूक बिल, कर्मचारी पगार, वीज बिल, बॅंकाची तडजोडीच्या रक्कमा इत्यादी जुनी देणी भागवून गळीत हंगाम 2023-24 साठी मशिनरी देखभाल दुरुस्ती लवकरच करून घेऊन काही दिवसांत बॉयलर पूजन व 10 ते 12 दिवसांत गळीत हंगाम सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच गाळम हंगाम सुरू करीत असून, सर्व शेतकरी सभासदांनी “राजगड’ला ऊस देऊन सहकार्य करावे, अशी माहिती कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली.
2 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
कारखाना संचालक मंडळाने हंगाम 2023-24 साठी 2 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, 2 हजार 321 हेक्टर आर उस क्षेत्राची नोंद केली आहे. त्यापासून 1 लाख 62 हजार टन ऊस उपलब्ध होणार आहे. गेटकेन क्षेत्रातून 38 हजार टन असे एकूण 2 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी असे नियोजन केलेले आहे.