रमेश चव्हाण
महाराष्ट्रातील समाजप्रबोधन चळवळीचे एक अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत दलितमित्र रा. ना. चव्हाण यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने… प. वा. रा. ना. चव्हाण हे बहुजन समाजातून आलेले एक विचारवंत होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात ज्या धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या चळवळी झाल्या, त्या चळवळीचे एक अभ्यासक व संशोधक म्हणून त्यांनी सतत साठ वर्षे (1933 ते 1993) विविध विषयांवर मूलगामी चिंतन करणारे लेखन केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या उभयतांच्या परिचयातून व सहवासातून त्यांची वैचारिक भूमिका पक्की झाली. महात्मा फुले यांच्या जीवनाशी व विचारांशी ते एकरूप झाले होते. ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज यातील सक्रिय सहभागामुळे त्यांचे धर्मपर चिंतन परिपक्व झाले.
वाई (सातारा) पंचक्रोशीतील सत्यशोधक समाजाचे ऊर्ध्वयू व ब्राह्मो समाजाचे संस्थापक नारायणराव चव्हाण हे “रा. ना.’चे पिताश्री होत. “रा. ना.’चा जन्म 29 ऑक्टोबर 1913 रोजी झाला. घरातील संस्कारक्षम वातावरणामुळे लहान वयातच निर्माण झालेली वाचनाची आवड पुढे वर्धमान झाली. वाचन, मनन, चिंतन व लेखन यातून त्यांनी आपली वैचारिकता संपन्न बनविली. समाजप्रबोधक व प्रबोधनपर चळवळींच्या तळाशी असलेली विचारसरणी सर्वसामान्यांसाठी ज्ञात करून दिली.
सत्यनिष्ठ संशोधकांची परंतु विनम्र अभ्यासकाची तौलनिक भूमिका स्वीकारून त्यांनी सातत्याने पाच तपे आपली लेखणी कार्यरत ठेवली. बेताच्या आर्थिक परिस्थितीत, कोणताही सत्ताधारकांचा आश्रय नसताना निरपेक्ष, निरलस व नि:स्वार्थी भावनेने लेखन प्रपंच उभा केला. त्यांचे लेखन अधिकांश वैचारिक स्वरूपाचे असले तरी त्यात अनेकविध विषयांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी, बदलत्या परिवर्तनाच्या दिशा, महात्मा फुले, राजर्षी शाहू, कर्मवीर वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार, आचार, उच्चार व कार्य,
त्याचे समाजजीवनावर झालेले परिणाम हे त्यांच्या चिंतनाचे विषय होते. यापेक्षा वेगळ्या व्यक्तींनी जे सामाजिक विचारमंथन केले, त्यावरही ते भाष्य करत राहिले. आधुनिक परिवर्तन चळवळींचे जनक, एकोणिसाव्या शतकातील सामाजिक व धार्मिक चळवळी, समाज क्रांतिवीर, धर्मांतराच्या समस्या, दलित चळवळी व जातवास्तव, मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या समाज जागृतीचे स्वरूप, लोकशाहीचा मूलभूत गाभा, मराठा नेतृत्व, सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ,
भारतीय संस्कृती, शिक्षण अशा विविध विषयांवर त्यांनी चिंतनात्मक लेखन केले आहे. महाराष्ट्रातील छोटी मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, मासिके यामधून लिहिलेल्या लेखांची संख्या 1200 ते 1300 पर्यंत आहे. याशिवाय वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्रे व पुरोगामी वैचारिक लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची परीक्षणे असा मोठा वैचारिक पण व्यापक लेखन-सांभार त्यांनी समाजहितैषी-बुद्धीने सातत्याने व निष्ठेने निर्माण केला.
अशा समतोल समाजचिंतकाचा मृत्यू 10 एप्रिल 1993 रोजी झाला. मोठ्या कालावधीत झालेले त्यांचे साक्षेपी लेखन म्हणजे महाराष्ट्राच्या 150 वर्षांच्या सामाजिक इतिहासाचे संदर्भ साहित्य आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या शब्दांत “ते साहित्य म्हणजे सामाजिक इतिहासाची बखरच होय’. नवीन पिढीला हे सर्व ज्ञात व्हावे, सामाजिक व राजकीय विषयांच्या अभ्यासकांना हे उपलब्ध व्हावे, या दृष्टिकोनातून त्यांच्या निधनानंतर रवींद्रनाथ चव्हाण यांच्या पुढाकाराने व डॉ. बाबा आढाव, बॅ. पी. जी. पाटील, प्रा. डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेल्या “रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानने’ या विधायक कार्याची जबाबदारी रमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वैशाली चव्हाण यांच्यावर टाकली.
सन 1994 पासून सुरू झालेल्या या प्रकाशन प्रकल्पास डॉ. शिवाजीराव चव्हाण व प्रा. वाळके सर यांनी अत्यंत कष्टपूर्वक तयार केलेली लेखन सूची पायाभूत झाली. आजपर्यंत 29 वर्षांत 42 पुस्तकांतून 14500 पानांचा मजकूर उपलब्ध केला असून 850 लेखांचे वर्गीकरण करून विषयवार ग्रंथबद्ध झाले आहेत आणि हे सर्व काम स्वावलंबनाने केले आहे. वैचारिक वाङ्मय उपेक्षित राहात असलेल्या काळात, प्रकाशक पुढे न आल्यामुळे, न थांबता संकलन कार्य पुढे नेत आहोत. वास्तविक तीन-चार वर्षे काम सुरू केल्यानंतर शासन, साहित्यसंस्था, विद्यापीठे, सामाजिक संस्था पुढे येतील असे वाटले होते. पण प्रयत्न करूनसुद्धा तसे घडले नाही.
हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. ग्रंथबद्ध झालेले साहित्य उपलब्ध झाल्याने अभ्यासक पुढे येत आहेत. या वाङ्मयावर तीन जणांना पीएच.डी. मिळाली असून अन्य पाचजण प्रबंधावर काम करत आहेत. काही विद्यापीठांतून या वाङ्मयावर चर्चासत्रे/परिसंवाद आयोजित होत आहेत. रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानने उपलब्ध केलेल्या त्यांच्या वाङ्मयाचा अधिकाधिक अभ्यास, चिकित्सा व विश्लेषण होणे यापुढे गरजेचे आहे. नव्या तरुण पिढीने यात अधिक सहभाग दाखवावा ही अपेक्षा आहे. रा. ना. चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन.