संपूर्ण विश्वात भारत हा असा एक देश आहे की, ज्याला प्राचीन ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. या देशावर अनेक आक्रमणे झाली, अनेक संकटे आली. त्यावेळी हा वारसा जपण्यासाठी निर्माण झालेले महापुरुष, संत, तपस्वी यांनी प्रसंगी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे आजही भारतीय संस्कृतीचा ध्वज मोठ्या दिमाखात जगात फडकत आहे. परंतु अलीकडच्या काळात समाजमनावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक तसेच शेजारील राष्ट्रांतील युद्धजन्य परिस्थिती, साथीचे रोग, बेरोजगारी या सर्व बाबींचे विपरीत परिणाम समाज मनावर पडल्याचे दिसून येत आहे.
जास्त जुना इतिहास न पाहता अलीकडच्या काळात राजकारणाविषयी बोलताना फक्त राजकारण, राजकारणी हा शब्द जरी ऐकला तरी त्याची पातळी किती खालावलेली आहे हे दिसून येते. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची चाललेली सत्तेसाठीची धडपड आणि ती काहीही करून हस्तगत करण्यासाठी पातळी सोडून होत असलेले राजकारण. आरोप-प्रत्यारोप त्यामुळे समाजातील महिला-पुरुष, तरुण-तरुणी तसेच बालकांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे. कारण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला या बाबी क्षणार्धात समजतात आणि जो तो ज्याच्या त्याच्या विचार क्षमतेनुसार विचार करताना दिसतो आहे. परंतु संबंधित पक्षातील राजकारणी हा विचार केव्हा करणार की, आपण जे वागतो आहोत त्याचे समाज मनावर काय परिणाम होतील.
एकमेकांवर शिवराळ भाषेत करत असलेली टीका टिप्पणी, खोटेनाटे आरोप, आंदोलनांची नौटंकी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनसामान्यांचा फार बदललेला दिसून येत आहे. या सर्व बाबींमुळे समाजाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. समाज आणि त्यामधील सर्व घटकांची मन भेदरलेली आहे. जगण्यासाठी धडपड करावी लागते ती धडपड करूनसुद्धा त्याच्या मनाला मानसिक समाधान मिळत नाही. याचे कारण म्हणजे सर्वांगीण अस्थिरता होय.
अलीकडेच करोना महामारीने समाजाचे आर्थिक, भावनिक कंबरडे मोडलेले असताना राज्यकर्ते मात्र वेगळ्याच मूडमध्ये स्वार्थी राजकारण करताहेत. आर्थिक गणित अजूनही समाज घटकांची जुळत नाहीत. त्यामुळे हवालदिल समाज स्वतःला सावरण्याच्या प्रतीक्षेत आहे. या प्रतीक्षेत असताना शेजारील राष्ट्र रशिया आणि युक्रेन यांच्यातील चालू असलेले युद्ध, त्यामुळे आणखीनच परिस्थिती गंभीर बनत आहे.जनसामान्यांच्या मनात तिसरे महायुद्ध होते की, काय याबाबत संशय कल्लोळ सुरू आहे. त्यामुळे समाज मनाची झोप उडालेली दिसते. अशा परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील सुरू असलेली विस्कळीतपणाची घडी बसण्याचे नाव घेत नाही. भविष्यात पिढ्यान्पिढ्या बरबाद होताना दिसतील. त्याच बरोबर बेरोजगारी, संघटित गुन्हेगारी वर तोंड काढतात. त्यामुळे समाज मनावर फार भयावह परिणाम दिसून येतो आहे.
या परिस्थितीतून समाजातील प्रत्येक घटकाने अशा वेळी स्वतः मन घट्ट करून अशा या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी आत्मविश्वासाने झगडले पाहिजे. त्यासाठी समाजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, आध्यात्मिक संतांनी समाजाला धीर देऊन मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे वाटते. त्यामुळे नक्कीच भेदरलेला समाज सावरायला वेळ लागणार नाही.
-डॉ. खुशाल मुंढे