सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा
नवी दिल्ली – केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही. फक्त गेल्या 60 वर्षांत काय घडले हेच सातत्याने सांगत आहे. तेच ते ऐकून आता सर्वांना कंटाळा आला आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मोदी सरकारवर निशाणा साधला.
लोकसभेत जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया म्हणाल्या, तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल वाईट वाटत असेल, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या आणि विशेष तरतुदी करण्यात यावी. नेहमीच गेल्या 60 वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही.
तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत. झालं ते सोडून देत तुम्ही का त्यांना मदत करत नाही. एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्याला निरोगी करेल.
कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही, असे उदाहरण देत त्यांनी केंद्र सरकारला सुनावले. तसेच सरकारने भूतकाळात न जगता वर्तमानकाळात जगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपने वास्तविकता जाणून घ्यावी
केंद्र सरकारने काश्मिरी लोकांना हजारो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबद्दल काहीही झाले नाही. तसेच काश्मिरी पंडितांसाठी ते काय करणार आहेत हे सरकारने सांगावे आणि त्यांच्या भविष्यावर चर्चा करावी. भाजपच्या सदस्यांनी केंद्रशासित प्रदेशात जाऊन वास्तविकता जाणून घ्यावी, असेही त्या म्हणाल्या. जम्मू आणि काश्मीरमधील जीडीपी आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी हा अयशस्वी प्रकल्प असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.