सत्येंद्र राठी
किराणाचे दुकान माहीत असणाऱ्या मला गायकीत “किराणा’ घराणा असतो आणि त्याचे प्रतिनिधित्व पंडित भीमसेन जोशी करतात ही उमज येण्यापर्यंत तारुण्य उजाडले. एकदा अपघातानेच चारबत्ती चौकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संगीत महोत्सवाला उपस्थित राहिलो.
नेमकी पंडितजींची अभंगवाणी कानावर पडली आणि श्रवणेंद्रियांचा खरा वापर काय हे पहिल्यांदा कळून चुकले. “ख्याल’ गायकीचा खयालही न करू शकणारा मी त्या स्वरतीर्थाच्या खळखळणाऱ्या लाटांच्या भरतीओहोटीत डुंबू लागलो आणि स्वराजाधिराजाच्या लाखो चाहत्यात आणखी एकाची भर पडली.
पुढे भविष्यात जेव्हा, जेथे, जसे शक्य झाले तेव्हा तेव्हा भीमसेनजींची “भीमपलासी’ ऐकण्याची एकही संधी सोडली नाही.
पंडितजींनी मुहूर्तमेढ केलेले सवाई गंधर्वचा पर्व मला नेहमीच पर्वणी देत राहिला. या सर्व घडामोडीत कधीतरी पंडितजींना भेटावे ही मनीषा अधूनमधून अंतर्मनातून डोकावत असे. जेव्हा त्यांना “भारतरत्न’ मिळाल्याची बातमी वर्तमानपत्रातून झळकली तेव्हा हे निमित्त घेत त्यांच्या अभिनंदनास सहकुटुंब जाण्याचे मनोमनी पक्के केले.
मी सहकुटुंब, मित्रपरिवारासह पंडितजींच्या भेटीस (भेट कसली, दर्शनच ते) पोहोचलो. आधी तर नवी पेठेच्या त्यांच्या “कलाश्री’ या बंगल्याच्या दाराजवळ थोडा वेळ घुटमळत राहिलो. आत जाण्याची हिंमतच होईना. जायचं काय? गेलो तर बोलायचं काय? तेथे आपल्यासारख्या आगंतुकाला विचारणार तरी कोण? असे नाना संशय पायांना दोलायमान करीत होते. शेवटी मनाचा हिय्या करून रखवालदारास येण्याचा मनसुबा सांगितला, त्याने हसतमुखाने आत जाण्यास अनुमती दिली.
बाहेर उभ्या असलेल्या झोपाळ्याचे लयबद्ध आंदोलन टिपत आम्ही हॉलमध्ये प्रवेश केला. एक मंद परिमळ वातावरणाची शुचिता वाढवत होता. बरेच चषक सामावलेल्या एका कपाटापुढे आरामखुर्चीत पंडितजी विसावलेले दिसले. चंदेरी चष्म्याच्या फ्रेममधून किलकिल्या डोळ्यांनी त्यांनी आमच्याकडे बघितले. अंगभर गुंडाळलेली शाल, कपाळी पांढरा टिळा, लांब मोकळे ठेवलेले पाय… त्यांच्या चरणी मस्तक ठेवताच “तीर्थ विठ्ठल क्षेत्र, विठ्ठल’चा नाद कानात घुमू लागला.
अस्तित्वाचा जणू मागमूसच संपला. त्यांच्या कुटुंबीयांनी स्मितहास्याने आमचे स्वागत केले, विचारपूस केली, सर्वांना पेढा दिला. जुजबी बोलणंही झालं. थोड्याशा अनौपचारिक गप्पा करत आम्ही वातावरणात समरस झालो. पंडितजी उच्चारत असलेले “जय-मल्हार, जय-मल्हार’ हे शब्द आसमंतात ऊर्जा निर्माण करीत होते. त्या स्पंदनाशी जुळवत, प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत आम्ही काही काळ आम्ही थांबलो.
पंडितजींकडे पाठ न करता आस्ते कदम आम्ही माघारी निघालो. “याची देही याची डोळा’ अशा अनुभुतीने व भारावलेल्या अवस्थेत आम्ही बाहेर पडलो तेव्हा “नवी’ पेठ अधिकच टवटवीत दिसून येत होती. पुढे कित्येक दिवस हा अनुभव मी माझ्या स्वकीयांना अभिमानाने वाटत होतो. “भारतरत्न’बरोबरची ही ग्रेट भेट माझ्या आयुष्यासाठी अनमोल ठेवा ठरली. पुढे ही ओढ मला गदगपर्यंत घेऊन गेली. तिथे पंडितजींच्या घरीही गेलो आणि त्यांच्या कुटुंबीयांशीही भेटलो.