पुणे, दि. 14 – पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या राज्यकर उपआयुक्त आणि कवयित्री अंजली ढमाळ-रसाळ यांच्या “ज्याचा त्याचा चांदवा..’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट काव्यनिर्मितीचा “सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
“ज्ञानपीठ’ विजेते वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होत असलेल्या “मराठी भाषा दिनी’ म्हणजेच शनिवार, दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
सुमती लांडे यांच्या श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशनतर्फे “ज्याचा त्याचा चांदवा…’ हा कवितासंग्रह गेल्या वर्षीच्या अखेरीस लॉकडऊन संपल्यानंतर प्रकाशित करण्यात आला होता. या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना आहे.
अल्पावधीत या कवितासंग्रहाला रसिक मान्यता मिळाली असून, त्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या अंजली ढमाळ-रसाळ यांच्या युट्युबवरील मुलाखतीलाही उत्तम प्रतिसाद लाभला होता. जीएसटी करप्रणालीसारख्या किचकट आकडेमोडीच्या कार्यात व्यस्त असूनही त्यांनी जपलेल्या संवेदनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे “ज्याचा त्याचा चांदवा..’ हा कवितासंग्रह असून या पुरस्काराबद्दल मूळच्या सातारच्या असलेल्या अंजली ढमाळ-रसाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.